Nashik: Good News! सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प सुरू करण्याची तारीख ठरली
नाशिक (Nashik): सिन्नर येथील इंडियाबुल्स सेझमधील रतन इंडियाचा औष्णिक वीज प्रकल्प महाजनको आणि एनटीपीसी यांच्या ताब्यात देण्यास राष्ट्रीय कंपनी लवादाने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मान्यता दिली. त्यानंतर एनटीपीसी लिमिटेड आणि महाजनको यांनी मागील महिन्यात भागधारक करार करण्यात आला. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी सिन्नर थर्मल पॉवर मध्ये रतन इंडियाने उभारलेले आधीचे दोन संच सुरू करून वीज निर्मिती करण्याची तयारी सुरू केली आहे.
या दोन संचांमधून साधारण ५४० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यासाठी मार्चपासून या औष्णिक वीज प्रकल्पात कर्मचारी नेमले जाणार असून सहा महिन्यांत हे दोन्ही संच सुरू होणार आहेत.या सरकारी कंपन्यांनी या प्रकल्पातून १३५० मेगावॉट वीज निर्मिती करण्याचा करार केलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुसळगावच्या शेतकऱ्यांकडून ४१८.०२ हेक्टर व गुळवंचच्या शेतकऱ्यांकडून ९७६.१५ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने २००६ मध्ये खरेदी केले होते. त्यातील पंधरा टक्के विकसित भूखंड जमीन धारकांना परत केल्यानंतर शासनाने उर्वरित ९०० हेक्टर भूखंड एमआयडीसीच्या माध्यमातून इंडियाबुल्सला भाडेतत्वावर दिले.
या जागेवर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. तेथे २०१५ मध्ये २७० मेगावॅट एका संचाची चाचणी झाली. तेव्हापासून हा प्रकल्प बंद आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने या प्रकल्पाचा लिलाव केल्यानंतर महाजनको–एनटीपीसी कंसोर्टियमने तब्बल ३८०० कोटींहून अधिक बोली या प्रकल्पाचा ताबा घेतला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पावर पूर्णत: नियंत्रण मिळणार आहे.
या माध्यमातून रतन पॉवरच्या प्रकल्पाचा हिश्याचा भाग ताब्यात येईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २७० मेगावॉटचे दोन संयंत्र (युनिट) सुरू केले जाणार आहे. हे दोन्ही संच साधारण सहा ते आठ महिन्यांत कार्यान्वित होतील, असा अंदाज आहे. एक मार्चपासून सिन्नर येथील प्रकल्पावर कर्मचारी नियुक्ती आणि इतर प्राथमिक कामांना सुरुवात होणार आहे.
रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक
सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी रोज आठ हजार मेट्रिक टन कोळसा लागणार आहे. हा कोळसा एकलहरे येथील औष्णिक वीज प्रकल्पावरून उचलला जाणार आहे. सध्या एकलहरे ते सिन्नर थर्मल पॉवर या दरम्यान रेल्वे मार्ग नाही.
यापूर्वी इंडियाबुल्सने रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, भूसंपादन व इतर कारणामुळे तो मार्ग रखडला आहे. आता महाजनको कोळसा वाहतुकीसाठी एकलहरे ते सिन्नर असा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. रेल्वे मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत एकलहरे येथील प्रकल्पात कोळसा उतरवला जाईल आणि तेथून रस्ते मार्गाने तो सिन्नरला नेला जाणार आहे. एकलहरे ते सिन्नर दरम्यान रोज चारशे वाहनांद्वारे ही वाहतूक करावी लागणार आहे.

