.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai) : मुंबईतील प्रत्येक रस्ते कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि आयआयटी यांच्यामार्फत प्रयत्न केले जात असले, तरी रस्त्यांच्या कामांबाबत होत असलेल्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. खुद्द भाजपसह विरोधक आणि बोरीवलीतील समाजसेविका मीरा कामत यांनीही मालाडमधील रस्ते कामांतील अनियमितेकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
महापालिका अधिकारी, तज्ज्ञ यांनी आम्ही सांगू तेथील रस्ते बांधकाम आणि त्याला जोडून गेलेल्या पर्जन्य जलवाहिनीच्या कामाची पाहणी करण्याचे आव्हान दिले आहे. यासाठी जो खर्च येईल, तोही आम्ही देवू; पण टेंडरमधील अटींप्रमाणे काम न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील काही कामे आता पूर्ण होत आली असून दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात झालेली आहे. या रस्ते कामांबाबत विरोधकांकडून आरोप होत असल्याने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली रहावी, यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
मात्र, प्रत्येक रस्ते कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि आयआयटी यांच्यामार्फत प्रयत्न केले जात असले, तरी रस्त्यांच्या कामांबाबत होत असलेल्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बोरीवलीतील समाजसेविका मीरा कामत यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांना निवेदन देवून या रस्ते विकास कामांतर्गत मालाड पी उत्तर विभागातील पाच रस्त्यांच्या कामांमधील अनियमितेबाबत शंका उपस्थित केली आहे. या पाचही रस्त्यांची नावे आयुक्तांना देवून त्यांनी जोवर आमच्या समोर तज्ज्ञ संस्थांसह या रस्त्यांची तपासणी केली जात नाही, तोवर ही कामे त्वरीत थांबवण्याचे निर्देश आपण द्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.
कामत यांनी महापालिका प्रशासनाला या पाचही रस्त्यांची तपासणी करण्याचे निर्देश देताना असे नमूद केले आहे की, रस्त्याचे बांधकाम आपण घालून दिलेल्या अटींप्रमाणे झाले किंवा नाही याची तपासणी आपण करता, तशीच तपासणी आपण करावी. परंतु त्या तपासणीचे ठिकाण तथा जागा आम्ही दाखवू. आम्ही जी जागा दाखवू त्या ठिकाणी महापालिकेने रस्ते बांधकामाची तपासणी करावी. म्हणजे रस्ते बांधकाम महापालिकेच्या टेंडरमधील अटींप्रमाणे कंत्राटदार कंपनी करते की नाही याबाबत जी शंका उपस्थित होते त्याची सत्यता समोर येईल. ही मागणी सर्वसामान्य जनतेच्यावतीने मी करत असून जर महापालिकेला हे शक्य नसेल, तर त्यासाठी लागणारे शुल्कही आम्ही भरण्यास तयार आहोत, असेही कामत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यामध्ये कामत यांनी रस्ते बांधकाम आणि त्याला जोडून केल्या जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीच्या बांधकामाची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
जर टेंडरमधील नियमांचे पालन करून खरोखर रस्ते बांधकाम होत असेल, तर मी आपला जाहीर सन्मान करेन, तसेच या तपासणीद्वारे आपण जनतेने सांगितलेल्या ठिकाणी तपासणी केल्याचे दाखले देवून जर योग्य बांधकाम झाल्याचे आढळून आल्यास एकप्रकारे महापालिका प्रशासनाला प्रमाणपत्रच मिळेल, जे भविष्यात सर्वांची तोंडे बंद करायला उपयुक्त ठरेल. पण जर यामध्ये दोष आढळून आल्यास कंत्राटदारांसोबत यासाठी देखरेखीकरता नेमलेल्या सल्लागारांवर कारवाई करावी. त्यामुळे आपल्याला पत्र पाठवल्याच्या १५ दिवसाच्या आत आमच्या मागणीनुसार रस्ते बांधकामाची तपासणी न केल्यास माझ्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असाही इशाराही कामत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.