
मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नाशिक ते वाढवण द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. हा अभ्यास पूर्ण होण्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागेल. १०३ किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी महामार्ग नाशिकला पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी जोडेल, ज्यामुळे नाशिक राज्यातील एक प्रमुख विकास केंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम घाटातील डोंगराळ भागातून जाणारे किमान दोन ते तीन रस्ते बोगदे, ज्याची रचना समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-कसारा दरम्यानच्या ७.७ किमी लांबीच्या बोगद्यासारखी असेल. समृद्धी महामार्गाचा हा बोगदा ४४ लाख टन दगड खोदून, २३,००० टन सिमेंट आणि ४०० टन स्टील वापरून बांधण्यात आला होता, ज्यामुळे प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. नाशिक-वधवन प्रकल्पातील बोगद्यांची लांबी प्रकल्पाचा आराखडा अंतिम झाल्यानंतर निश्चित होईल, असे एमएसआरडीसीतील उच्चपदस्थांनी सांगितले.
हा द्रुतगती महामार्ग वाढवण येथील ७६,२०० कोटी रुपये खर्चाच्या ग्रीनफिल्ड खोल समुद्र बंदराशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. व्यवहार्यता अभ्यासात मार्ग, जमीन संपादन आणि तपशीलांची पडताळणी केली जाईल. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर, एमएसआरडीसी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करेल, ज्यासाठी सुमारे सहा महिने लागतील. डीपीआरला मंजुरी मिळाल्यावर बांधकामासाठी टेंडर प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पामुळे नाशिक आणि वाढवण दरम्यानचा प्रवास सुकर होईलच, शिवाय आर्थिक विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.