
पुणे (Pune) : मार्केट यार्डातील वाहतूक कोंडी, चोऱ्या, अवैध धंदे बंद होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे वारंवार सुरक्षा एजन्सी बदलूनही फायदा होत नसल्याने अडते, कामगार आणि खरेदीदार त्रस्त झाले आहेत. अनेकदा सुरक्षारक्षक एकाच ठिकाणी गप्पा मारताना दिसून येत आहेत. त्यांच्यावर कोणी कारवाई करणार का आणि वाहतूक कोंडी सुटणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्केट यार्डात फळबाजार, तरकारी, गूळ-भुसार विभागात शेतमाल चोऱ्यांसह गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, दुकाने फोडून मुद्देमाल चोरणे, कॅमेरा, एसीचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पूर्वी फळ-भाजीपाला विभागात सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेका दोन ठेकेदारांना दिला होता. त्यानंतर दुसऱ्या कंपनीला हा ठेका देण्यात आला. मात्र, परिस्थिती बदलली नाही. प्रशासनाने पुन्हा शासनाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाकडे सुरक्षेची जबाबादारी दिली आहे. मात्र, बाजारात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुककोंडी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष सुरक्षारक्षक नसतात. केवळ प्रवेशव्दार आणि शारदा गजानन मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांचा घोळका दिसतो. मात्र, बाजारात ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसते.
प्रशासनावर फोडले खापर
वाहतूक कोंडी सुटत नसल्याबाबतची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षारक्षक बलाने झटकली आहे. त्यांनी बाजार समिती प्रशासनावरच याचे खापर फोडले आहे. बाजार आवारात बलाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाई करत असताना सातत्याने वरिष्ठांचे फोन येतात, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतचे पत्र देखील त्यांनी बाजार समितीला दिले आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बल काम करत नाहीत. प्रवेशद्वारावर सातत्याने ते बसून असतात. कोणाची गाडी आली तरी त्यांच्याकडून कोणतीही चौकशी होत नाही. बाजारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सभापती, सचिव आणि संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे.
- दत्तात्रेय पायगुडे, उपसभापती, पुणे बाजार समिती
वाहतूक कोंडीची करणे
१) वाहन चालकांना शिस्त नाही
२) सुरक्षा रक्षक नेमून दिलेल्या जागेवर उपलब्ध नसणे
३) बाजारात दोन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश दिला जातो
४) डमी अडते रस्त्यावरच शेतमाल विकतात
५) कारवाई करताना प्रशासनाचाच हस्तक्षेप