
नाशिक (Nashik) : बहुप्रतिक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. शिर्डी येथे केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एका महिन्यात या महामार्गाच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असे स्पष्ट केल्याने आशा उंचावल्या आहेत. या प्रस्तावित महामार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते. मात्र आता या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळेल, अशी चिन्हे दिसत आहे. या महामार्गाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव कॅबिनेटच्या समोर ठेवण्यात आला असून, पुढील महिन्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
या महामार्गाचे काम भारतमाला परियोजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. गुजरामधील सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि अक्कलकोट, चेन्नई शहरांमधून जाणार आहे. या महामार्गाची लांबी सोळाशे किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे सुरत ते चेन्नई हा प्रवास वेगवान होणार आहे. शिवाय दिल्ली ते चेन्नई या प्रवासाचे अंतर साडेतीनशे किलोमीटरने कमी होणार आहे. या महामार्गासाठी ४२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी चार हजार २३१ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. हा प्रकल्प जमिनीच्या अधिग्रहणामुळे रद्द करण्यात आला होता. जमीन अधिग्रहणासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि यामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. मात्र आता या प्रकल्पाला पुन्हा एकदा मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असून, हा प्रकल्प कॅबिनेटच्या पुढे आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे मंत्री गडकरी यांनी महिनाभरात या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये बाधित होत आहेत, त्यांना ताबडतोब पैसे मिळतील, असेही गडकरी यांनी सांगितले.
नाशिक-सोलापूर १३५ कि.मी.ने कमी
नाशिक ते सोलापूर हे अंतर १३५, तर सुरत ते चेन्नईचे अंतर ३२० किलोमीटरने कमी होणार आहे. या महामार्गाची नाशिक जिल्ह्यातील लांबी १२२ किलोमीटर इतकी राहील. अहिल्यानगर (१४१), बीड (३८), धाराशिव (८६) किलोमीटर एवढी राहणार आहे.