
मुंबई (Mumbai) : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai Pune expressway) मिसिंग लिंकचे (Missing Link) काम शेवटच्या टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतला. सुमारे १३.३० कि.मी. लांबीच्या मिसिंग लिंकच्या पॅकेज एक आणि दोनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीचे पुलाचे काम सध्या सुरू आहे. हवेचा दाब आणि पुलाचे काम याची सातत्याने चाचणी करीत काम सुरू आहे.
मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासात अजून २० ते २५ मिनिटांची बचत होणार असून त्याचे काम करताना कुठलीही तडजोड करू नका. उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा. कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी घ्या, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव दशपुते आदी यावेळी उपस्थित होते.
काय आहे मिसिंग लिंक प्रकल्प?
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. तसेच, पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. हे लक्षात घेऊन, हा नवीन मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.
हा सुधारित मार्ग खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग आहे.
यामध्ये सध्याचे १९ किमीचे अंतर ६ किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे. प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत, इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट, घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.