
मुंबई (Mumbai) : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Expressway) आमने नोड बीकेसी, नोएडा प्रमाणे विकसित होणार आहे. (Eknath Shinde, Amne Node, BKC, Noida News)
या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत याभागातून होणारी वाहतूक लक्षात घेता जेएनपीए आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गासाठी पर्याय शोधण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याभागातील नाशिक महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समृद्धी महामार्गावरील आमने नोड कामाचा आढावा घेतला.
ठाणे, रायगड, पालघर याभागाला आमने नोड जोडला जाणार असून भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून ते विकासित होणार आहे. याभागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. आमने नोड १० हजार ७९१ हेक्टर क्षेत्र असून त्याठिकाणी इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टीक हब, ॲग्रीक्ल्चर हब, फूड प्रोसेसिंग पार्क आदी विकास कामे प्रस्तावित आहेत.
आमने नोडमुळे भविष्यातील वाढणारी वाहतुक लक्षात घेता नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. याभागातून जाणाऱ्या नाशिक महामार्गाचे काम वेळेत आणि पावसाळ्यापूर्वी करण्याचे निर्देश देतानाच वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण होईपर्यंत नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
आमने नोड कडून नाशिक, मनोर वाडा रस्ता, जेएनपीएकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय शोधावेत. वाहतुक नियंत्रित करण्यासाठी अवजड वाहनांसाठी वेळेचे नियमन तसेच ट्राफीक वॉर्डनची संख्या वाढवण्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव संजय दशपुते आदी यावेळी उपस्थित होते.