
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको टी पाॅईट लगत हरितपट्ट्यात दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा स्थलांतर व सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. ठेकेदाराने अत्यंत वर्दळीच्या वळण रस्त्यावर पत्रे ठोकून रस्ता बंद करून यंत्रणा पसार केली आहे.
अपघातासाठी अत्यंत ब्लॅकस्पाॅट समजल्या जाणाऱ्या येथील चौकात ऐन दिवाळीत सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. याचे महापालिकेतील बेफिकीर कारभाऱ्यांना मात्र कसलेही सोयरसूतक नसल्याचे दिसत आहे.
पुतळ्याचे स्थलांतर आणि सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने जनतेच्या पैशातून मोठी आर्थिक तरतूद केली आहे. असे असताना काम गत महिन्याभरापासून रखडल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराकडे विचारणा केली असता अद्याप प्रकल्प विकास आराखडा अंतिम झाला नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले.
सिडको टी पाॅईंट येथील अक्षयदीप प्लाझा वाणीज्य संकुलाच्या शेजारी हरित पट्ट्यात हरित क्रांतीचे प्रणेते, यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा भव्यदिव्य पुतळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने दोन वर्षापुर्वी घेतला होता.
सद्यःस्थितीत उभारण्यात आलेला पुतळा जालना रस्त्याच्या सर्व्हिस रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघाताला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सदर पुतळा सिडको टी पाॅईंटच्या दिशेने अक्षयदीप प्लाझाच्या समोरील हरितपट्ट्यात स्थलांतरीत करून तेथे सौंदर्यीकरणाचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मात्र गत महिन्याभरापासून हे काम रखडले आहे. ठेकेदाराने सिडको टी पाॅईंट येथील अत्यंत वर्दळीच्या एल टाईप वळण मार्गावर पत्रे ठोकून हा वळणमार्गच बंद केल्याने तेथे ऐन सणासुदीच्या काळात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षाची आकडेवारी शोधली असता याच चौकाने ४८ बळी घेतले आहेत. सर्वाधिक अपघात एसटी बसेसमुळे झाल्याची नोंद आहे. हाकेच्या अंतरावर सिडको बसस्थानक असल्याने स्थानकातून पूर्व मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस याच सिग्नल असलेल्या ठिकाणाहून वळण घेतात.
नाईकांच्या पुतळ्याचे स्थलांतर व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतल्यानंतर गत दोन वर्षांपासून आधी हे काम निधीसाठी अडकले होते. यानंतर सव्वाकोटीची देखभाल व दुरूस्तीसाठी तरतुदही करण्यात आली होती. महापालिका फंडातून प्राप्त निधीतून ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र निधीची तरतूद होऊनही अद्याप पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामाने वेग घेतला नाही. सदर कामासाठी सविस्तर विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी धीरज देशमुख या प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ति करण्यात आली आहे. सदर कामाचा ठेका शहरातील शीतल पहाडे यांच्या बालाजी कंन्सट्रक्शन कंपनीला दिला आहे. याकामासाठी त्यांनी ०.१४ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
यासंदर्भात वार्ड अभियंत्याकडे विचारले असता अद्याप सुधारीत डिझाईन प्रकल्प व्यवस्थापकाकडून मंजूर नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. यानंतर ठेकेदार शितल पहाडे यांना पुतळा स्थलांतर आणि सौंदर्यीकरणाचे काम कुठवर आले, त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती विचारली असता शनिवारी मार्किंग करण्यात आली होती. मात्र प्रस्तावित जागेच्या पाठीमागेच महावितरण कंपनीची डीपी असल्याने अडथळा येत असल्याचे ते म्हणाले.
पुतळ्याच्या पाठीमागे ७२ फुटाचा टाॅवर आहे, शहागंजच्या धर्तीवर तेथे घड्याळाची टीकटीक देखील सुरू होणार आहे. जुन्या आराखड्यानुसार तेथे जागेची कमतरता भासत आहे, तेथे मोठ्याप्रमाणात सौदर्यीकरणाचे काम असल्याने डीपी हलवणे गरजेचे आहेत. सदर पुतळा स्थलांतरीत करणे व सौंदर्यीकरणासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापकांकडून आराखडा अंतिम झाल्यावर प्रशासकांची मान्यता मिळाल्यावर काम आठ दिवसात सुरू होईल, अशी कारणे त्यांनी पुढे केली आहेत.
प्रतिनिधीने सदर कामाची सद्यस्थिती जाणून घेतली असता यात महापालिका अधिकारी , प्रकल्प व्यवस्थापक तसेच ठेकेदाराचा प्रचंड हलगर्जीपणा समोर आला आहे. अंत्यंत वर्दळीच्या ज्या वळणमार्गाने मागील दहा वर्षात ४८ बळी घेतले आहेत. तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी दोनदा एसटीबसचा अपघात होऊन चार दुचाकीस्वारांचा बळी घेतला आहे..इतक्या भयंकर घटना ताज्या असताना महापालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक सहाच्या अधिकाऱ्यांना पुतळा स्थलांतरण व सौंदर्यीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई व हलगर्जीपणा दिसून येत आहे.