Nashik Pune Railway Tendernama
टेंडर न्यूज

Nashik Shirdi Railway: नाशिक-पुणे ऐवजी नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गाला गती; 'त्या' 34 गावांत भूसंपादनाचे आदेश

एकलहरे-इंडियाबुल्स मार्गावरून जाणार नवीन दुहेरी रेल्वेमार्ग; सिन्नरमधील २३ आणि नाशिकमधील ११ गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने सुरू केली प्रक्रिया

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): वादग्रस्त ठरलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या बदललेल्या आरेखनावरून राजकीय वाद आणि संभ्रम सुरू असतानाच, जिल्हा प्रशासनाने नाशिक-शिर्डी या नवीन दुहेरी रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील २३ आणि नाशिक तालुक्यातील ११ अशा एकूण ३४ बाधित गावांमध्ये भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाने अधिकृत सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामुळे या रेल्वे प्रकल्पाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

नाशिक ते पुणे थेट रेल्वे मार्ग आणि त्याच्या बदललेल्या आरेखनावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आता नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला वेगाने पुढे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दरम्यानच्या या नव्या रेल्वेमार्गासाठी मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे जिल्हा प्रशासनाने भूसंपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. हा नवीन रेल्वेमार्ग पूर्वी भूसंपादन करण्यात आलेल्या एकलहरे ते इंडियाबुल्स याच मार्गावरून प्रस्तावित करण्यात आला असून, तेथून पुढे तो शिर्डीपर्यंत वाढवला जाणार आहे.

या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची संपूर्ण जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या ३४ गावांच्या यादीमुळे हा प्रकल्प सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्पाच्या रखडलेल्या रेल्वेमार्गाचेच विस्तारीकरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोळसा वाहतूक आणि सिन्नर वीज प्रकल्पाला संजीवनी
पूर्वी रतन इंडिया (इंडियाबुल्स) कंपनीने सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्पाला कोळसा वाहून नेण्यासाठी या मार्गावर रेल्वे लाईन उभारण्याचे काम हाती घेतले होते. काही ठिकाणी पूल बांधण्याचे कामही सुरू झाले होते, परंतु कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर हा प्रकल्प आणि रेल्वेमार्ग दोन्ही रखडले. आता हा दिवाळखोरीत गेलेला प्रकल्प एनटीपीसी (NTPC) आणि महाजनको (Mahagenco) यांनी संयुक्तरित्या ताब्यात घेतला असून, वीजनिर्मितीसाठी कोळशाची वाहतूक करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून इंडियाबुल्सने पूर्वी भूसंपादन केलेल्या मार्गावरूनच रेल्वेमार्ग उभारून तो पुढे शिर्डीपर्यंत जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औष्णिक वीज केंद्राला आवश्यक असणारा कोळसा नाशिकरोडच्या मालधक्क्यावरून थेट सिन्नरपर्यंत पोहोचवता येईल, तसेच भविष्यात मुंबई ते शिर्डी आणि पुणे ते नाशिक या रेल्वेगाड्या चालवणेही शक्य होईल.

कोणकोणत्या ३४ गावांमध्ये होणार भूसंपादन?
या दुहेरी रेल्वे प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील २३ गावे आणि नाशिक तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.

  • सिन्नर तालुका (२३ गावे): जायगाव, ब्राम्हणवाडे, देशवंडी, पाटपिंप्री, बारागावप्रिंप्री, मुसळगाव, कुंदेवाडी, दातली, खंबाळे, bhokani, पांगरी फुलेनगर, वावी, मलढोण, सायाळे, पाथरे खुर्द आणि इतर संबंधित गावांचा यात समावेश आहे.

  • नाशिक तालुका (११ गावे): जाखोरी, देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, चेहेडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, पंचक आणि चाडेगाव या गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे.

नाशिक-पुणे रेल्वेचे भविष्य काय?
महाराष्ट्र सरकारने महारेलच्या माध्यमातून नाशिक-पुणे रेल्वे कायापालटासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला होता. मात्र, रेल्वे मंत्रालयाने तो तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे सांगत फेटाळून लावला. त्यानंतर या मार्गात बदल करून तो शिर्डीमार्गे नेण्याचा पर्याय सुचवला गेला, ज्याला पुणे आणि नगर जिल्ह्यांतील स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आता नाशिक-शिर्डी या दुहेरी मार्गासाठी नव्याने भूसंपादन सुरू झाल्यामुळे, मूळचा थेट नाशिक-पुणे रेल्वेमार्ग कायमचा रेंगाळणार का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

असे असले तरी, हा नवीन रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते थेट शिर्डी रेल्वे प्रवासासाठी अधिक सोयीचा ठरेल. तसेच दक्षिण भारतातून साईनगर शिर्डीपर्यंत येणाऱ्या रेल्वेगाड्या पुढे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत आणणे शक्य होणार असल्याने येथील पर्यटन आणि दळणवळणाला मोठी गती मिळेल.

Key Points Summary

  • नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या वादात आता नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाला वेग.

  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील २३ आणि नाशिक तालुक्यातील ११ अशा एकूण ३४ गावांमध्ये भूसंपादन होणार.

  • भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवली.

  • हा रेल्वेमार्ग पूर्वीच्या एकलहरे-इंडियाबुल्स कोळसा वाहतूक मार्गावरूनच पुढे शिर्डीपर्यंत नेला जाईल.

  • एनटीपीसी आणि महाजनकोच्या ताब्यात गेलेल्या सिन्नर औष्णिक वीज प्रकल्पाचा कोळसा वाहतुकीचा प्रश्न सुटणार.

  • या नव्या दुहेरी मार्गामुळे दक्षिण भारतातून शिर्डीला येणाऱ्या रेल्वे गाड्या थेट नाशिकपर्यंत आणणे शक्य होईल.