
मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरा-भाईंदर, ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी संपन्न झाली. याप्रसंगी फडणवीस यांनी मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची तांत्रिक पाहणी करून मेट्रोने प्रवास केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या आहेत. ही मेट्रो लाईन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. पहिल्यांदाच मेट्रो आणि उड्डाणपूल एकत्रित स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. मिरा-भाईंदरसाठी ही लाईन मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. २०२७ पर्यंत मेट्रो प्रवासाचा झपाट्याने विस्तार होईल.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लवकरच विरारपर्यंत मेट्रोने प्रवास शक्य होणार आहे. विविध मेट्रो मार्गिका एकमेकांसोबत जोडल्यामुळे प्रवाशांना 'एंड टू एंड सोल्युशन' मिळेल. यासोबतच वाढवण येथे तयार होणार्या बुलेट ट्रेनच्या स्थानकासोबत मेट्रोचे 'इंटिग्रेशन' करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळेल. एमएमआरडीएच्या नेतृत्वात ३३७ किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क उभारले जात आहे. दरवर्षी ५०-६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे वाहनांची गर्दी कमी होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मेट्रो लाईन-९ ही सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरणारी आहे. कमी वेळात जास्त अंतर पार करण्याची सुविधा, इंटरचेंजेसमुळे अधिक सुगम प्रवास, आणि एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले, “मेट्रो लाईन-9 ही फक्त एक नवीन लाईन नाही, तर मिरा-भाईंदरला संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ही लाईन मेट्रो 2A, 7, 1 आणि भविष्यातील लाईन 10 व 13 शी सहजपणे जोडली जाईल. त्यामुळे मिरा-भाईंदरहून अंधेरी, घाटकोपर, ठाणे आणि वसई-विरारसारख्या भागात अखंड प्रवास शक्य होईल. ‘मिनिटांत मुंबई’ ही आपली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही लाईन एक निर्णायक पाऊल आहे.
ही ट्रायल रन फक्त एक तांत्रिक चाचणी नसून मिरा-भाईंदरसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी शाश्वत, सुलभ आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.
मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला आहे, जिथे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत. मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा हा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीचा असून या मार्गावर चार स्थानके आहेत – दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव.
जोडणीचे नवे दालन
या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे आणि वेगवान होणार आहे
CSMIA आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी (लाइन 7, 7A द्वारे)
अंधेरी पश्चिम (लाइन 2B)
घाटकोपर (लाइन 1 व 7)
लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन 2A)
मिरा गाव मेट्रो स्टेशन मार्गे मेट्रो लाईन 10 द्वारे ठाण्याला जोडणे (भविष्यात)
भविष्यात वसई-विरार (लाइन 13 – NSCB स्थानक)
अपेक्षित फायदे
दहिसर टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल
प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट
ऊर्जा बचतीसाठी ‘रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग’ तंत्रज्ञान
पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा वापर
सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि वेळेत बचत