

नागपूर (Nagpur): एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे. राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूकसेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.
सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय, भाई जगताप, अनिल परब, प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
परिवहन मंत्री यांनी सांगितले, राज्यात बससेवेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. तीन हजार बस खरेदीची टेंडर प्रक्रिया पूर्ण केली असून, पाच हजार बसेससाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. तसेच येत्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्यात २५ हजार बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महामंडळाच्या कामगारांची देय असलेले देणी देण्यास निधीची कमतरता भासणार असे सरनाईक यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ते म्हणाले, एसटी महामंडळाच्या कामगारांची देय असलेली ४ हजार १९० कोटी इतकी रक्कम देण्यात येत आहे. यासाठी निधीची पुरवणी मागण्यांमध्ये मागणी करण्यात आली आहे. यामुळे कामगारांची थकबाकी येत्या सहा ते आठ महिन्यांत कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरनाईक म्हणाले, सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर एसटी महामंडळाचे बस डेपो व जागा विकसित करण्यात येणार आहेत. याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही वापरण्यात येईल. एसटी महामंडळांचे उत्पन वाढविण्यासाठी अनेक स्रोत निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिवहन विभागाने हळूहळू डिझेल बसेस हटवून पर्यावरणपूरक पर्यायी बसचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.