

नाशिक (Nashik) : नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सिन्नर तालुक्यातील मोह आणि चिंचोली या दोन गावांमध्ये औद्योगिक नगर योजना (Industrial Township) साकारण्यात येत आहे. औद्योगिक नगर योजनेसाठी २०२ एकर जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या औद्योगिक नगरामध्ये कारखाने, उत्पादन युनिट्स आणि संबंधित उद्योगांची स्थापना करण्याबरोबरच निवास सुविधा व त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश होणार असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून या औद्योगिक नगराची उभारणी केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारची औद्योगिक नगर (Industrial Township) ही एक एकात्मिक (Integrated) औद्योगिक व शहरी विकासाची योजना आहे. ही योजना औद्योगिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ या संस्थांच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेतून औद्योगिक क्षेत्रांमध्ये शहरी सुविधा उभारून तेथे रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरणपूरक विकास साधला जातो.
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यातर्फे चिंचोली व मोह येथे उभारल्या जात असलेल्या औद्योगिक नगरमध्ये २०० एकरांवर ६० औद्योगिक भूखंड पडणार आहेत, असे एनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले आहे. त्या ६० भूखंडांवर ४५ हून अधिक लहान-मोठ्या कंपन्या सुरू होऊन तेथे पहिल्या टप्प्यात जवळपास १७ हजार लोकांना येथे रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.
या औद्योगिक नगरात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि त्याला सुनियोजित शहरांमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. त्यासाठी पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते या सुविधा उभारल्या जाणार आहेत. हे औद्योगिक शहर दोन टप्प्यांत उभारले जाणार असून पहिला टप्पा ९० एकर, तर दुसरा टप्पा ११२ एकरचा असणार आहे.
सध्या मोजणा सुरू असलेल्या २०२ एकर जमिनीपैकी ६० टक्के जमीन शेतकऱ्यांना प्लॉट पाडून परत दिला जाणार आहे. उर्वरित ४० टक्के जमिनीवर औद्योगिक नगर कार्यालय, कामगारांसाठी निवास, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्यसुविधा निर्माण केल्या जातील. विकसित करून दिलेले भूखंड शेतकरी कंपन्यांना विकू शकतील. जेथे त्यांना योग्य मोबदला मिळेल.
एनएमआरडीए आयुक्त जलज शर्मा यांनी मंगळवारी औद्योगिक नगर रचनेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महानगर नियोजककार जयश्री राणी सुर्वे, उपमहानगर अभियंता शरद साळुंखे, उपमहानगर नियोजककार अश्वर्य खैरनार, सहायक नियोजककार शिवानी वामन व योजनेतील भूधारक उपस्थित होते. या जागेवर सध्या अंतर्गत रस्ते, विजेचे खांब, भूमिगत गटारी, पाण्याची व्यवस्था, आदी कामे प्रगतिपथावर असून मे २०२६ पर्यंत सर्व सुविधा उभारण्यात येतील.
या योजनांमुळे पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. या औद्योगिक नगरात मे २०२६ अखेरीसपर्यंत प्रत्यक्ष उद्योग उभे राहण्यास सुरुवात होईल.