

नाशिक (Nashik): त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी वाहती नसून ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावल्यानंतर ती कुशावर्त तीर्थात अवतरली आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंडात कुंभस्नान केले जाते. याशिवाय वर्षभर असलेल्या पर्वणी काळातही याच कुंडात स्नान केले जाते. एकाच वेळी हजारो भाविक स्नान करीत असल्याने ते पाणी अशुद्ध होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
यामुळे कुशावर्त कुंड शुद्ध करण्यासाठी मागील सिंहस्थात एक जलशुद्धी प्रकल्प उभारला होता. मात्र, सिंहस्थानंतर या प्रकल्पाचे वीज बिल कोणी भरायचे यामुळे तो बंद पडला व त्याच खराब पाण्यात स्नान करण्याशिवाय भाविकांना पर्याय नव्हता.
या सिंहस्थात कुंभमेळा प्राधिकरणाने यावर तोडगा शोधला आहे. कुशावर्त कुंड शुद्धीकरण प्रकल्प एक खासगी कंपनी सीएसआर निधीतून उभारणार असून, त्याची देखभालही पुढील २५ वर्षे बघणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नानाला महत्व असते. देशातील प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन येथे विस्तीर्ण नदीपात्रात भाविक कुंभस्नान करतात. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी उगम पावते. यामुळे एकतर गोदावरी बाल्यावस्थेत आहे. यामुळे कुशावर्त कुंडात कुंभस्नान केले जाते. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ यात्रा, महाशिवरात्री, श्रावण महिना, या काळात लाखो भाविक दर्शनासाठी, ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येतात. मात्र, एकाच कुंडात हजारो भाविक स्नान करीत असल्याने त्या पाण्याच्या अशुद्धतेचा व भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
यामुळे मागील सिंहस्थ कुंभमेळा काळात सरकारने कुशावर्त कुंड स्वच्छतेसाठी एका तासाला एक लाख लिटर पाणी शुद्ध करू शकेल, असा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला होता. सिंहस्थानंतर तो प्रकल्प नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, त्याचे वीजबिल भरण्याची पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने तो प्रकल्प नियमितपणे चालवला गेला नाही. यामुळे कुशावर्त कुंडातील पाण्याच्या स्वच्छतेचा प्रश्न कायम राहिला.
कुशावर्त स्वच्छतेचा प्रश्न समजून घेऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने व्हीआयएल कंपनीने त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडाच्या जल शुद्धीकरण व पुनरुज्जीवनासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्पाची तयारी केली आहे. हे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
त्र्यंबकेश्वरला गर्दीच्या काळात कुंडातील पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खराब होते. आरोग्याच्या दृष्टीने विद्यमान १००घन मीटर प्रतितास (ताशी एक लाख लिटर) ऐवजी प्रस्तावित ३०० घन मीटर प्रतितास (ताशी ३ लाख लिटर) क्षमतेच्या उपचार सयंत्रामुळे संपूर्ण कुंड आता ९ तासाऐवजी ३ तासात स्वच्छ करता येणे शक्य होणार आहे. पाण्याची गुणवत्ता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सातत्याने टिकवता येणार आहे. तसेच २५ वर्षांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी व्हीआयएल कंपनीची राहणार आहे.
कुशावर्त कुंड स्वच्छतेबाबत १५ डिसेंबर२०२५ ला व्हीआयएलने कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात सादरीकरण केले होते. त्यात तांत्रिक तपशील, क्षमतावाढ, उपचार पद्धती आणि अंमलबजावणी रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे.
प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून हस्तांतरण, वीजपुरवठा आणि संबंधित परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने केली जाणार आहे. या अनुषंगाने प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यासाठी आणखी एक बैठक २६ डिसेंबरला होणार आहे.
या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम जुन २०२६ अखेर पुर्ण होणे अपेक्षित असून यामुळे कुशावर्त कुंडातील पाणी आरोग्याच्या दृष्टीने सतत स्नानयोग्य दर्जाचे राहील आणि तीर्थक्षेत्रातील स्वच्छता राखली जाणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.