Nashik : देवेंद्र फडणवीसांच्या सौरऊर्जा प्रकल्प घोषणेला एकलहरेतून विरोध

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नाशिक (Nashik) : येथील एकलहरे औष्णिक विजनिर्मिती केंद्रातील सध्याचा प्रकल्प बंद करून त्या जागेवर सौरवीजनिर्मिती प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. मात्र, या प्रकल्पास कामगार व स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.  सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाऐवजी सरकारने २५० मेगावॅटचे दोन औष्णिक वीजनिर्मिती संच उभारून द्यावेत, अशी मागणी कंत्राटी कामगारांकडून व स्थानिकांकडून केली जात आहे. येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प बंद पडल्यास या प्रकल्पावर प्रत्यक्ष व प्रत्यक्ष अवलंबून असलेल्या दहा हजार जणांचे काय होणार, याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis
Pune-Mumbai जुन्या महामार्गावरील रुंदीकरणाचे काम वेगात; खडकीतील वाहतूक होणार सुरळीत

नाशिक तालुक्यतील एकलहरे येथे २१० मेगावॅट क्षमतेचे तीन संच कार्यन्वित आहेत. त्यांचे आयुर्मान संपत आले आहे. त्यामुळे २०११ मध्ये ६६० मेगावॅट प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र, या प्रकल्पाबाबत काहीही हालचाल होत नसून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकलहरे येथे तांत्रिक कारणामुळे नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारणे शक्य नसल्याने तेथे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. यापूर्वीच्या अधिवेशनात स्वता फडणवीस यांनी या ठिकाणीच प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या नवीन घोषणेमुळे सध्याच्या प्रकल्पातील कामगार तसेच या प्रकल्पाच्या आधारावर अवलंबून असणारे व्यावसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण असून एकलहरे येथे सौरऊर्जा प्रकल्प नको, अशी भूमिका घेतली आहे.

Devendra Fadnavis
Nashik : महापालिकेच्या 240 कोटींचे नियोजन कोण करणार? माजी नगरसेवक की आमदार?

ऊर्जा मंत्रालयाने आधी केलेल्या नियोजनानुसार एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील टप्पा एकच्या जागी व वसाहतीचा काही भाग तोडून नवा ६६० चा बदली संच उभारण्यात येणार होता. मात्र तेरा वर्ष उलटूनही हा प्रकल्प मात्र उभा राहिला नाही. नाशिकच्या प्रकल्पातून वीजनिर्मिती महाग पडते, असे कारण वरिष्ठ स्तरावरून दिले जात असते. मात्र, सध्याचे वीजनिर्मिती संच ४० वर्षांचे झाले असूनही ते पूर्ण क्षमतेने ऊर्जा निर्मिती करत आहेत.  नवीन संच झाल्यावर विज निर्मिती दर कमी राहील, यामुळे येथे नवीन संच उभारवेत, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान सध्याच्या वीजनिर्मिती संचाचे काही दिवसांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट झालेले आहे आणि हा प्रकल्प चालवणे धोकादायक असल्यामुळे हे संच बंद करण्याचे आदेश कधी येऊ शकतात, अशी चर्चा आहे. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या हजारो कंत्राटी कामगारांनी जायचे कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. या औष्णिक वीज प्रकल्पावर जवळपास दहा हजारावर नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अवलंबून ओत. सोलर प्रकल्पासाठी अगदी मोजके मनुष्यबळ लागत असल्याने सध्याची एकलहरे परिसरातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे एकलहरेत नवीन औष्णिक होणार नसल्याची घोषणा ऐकून कंत्राटी कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Devendra Fadnavis
Nashik ZP : मिशन भगिरथच्या मार्गातील अडथळे दूर; नवीन आराखड्याची तयारी सुरू

कुठल्याही औष्णिक वीजनिर्मिती संचाचे आयुर्मान २५ वर्षाचे असते. त्यानंतर दर काही वर्षांनी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होत रहाते. या संचांचे ऑडिट होणे बाकी आहे . या संचाच्या आयुर्मान वाढण्यासाठीच्या उपाययोजना आय आय टी पवई ही संस्था करणार आहे.
- प्रफ्फुल भदाने,  मुख्य अभियंता, एकलहरे, औष्णिक वीजनिर्मिती केंद्र

एकलहरे येथील औष्णिक वीज प्रकल्प बंद पडल्यास स्थानिक रोजगारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. यामुळे येथे सौरऊर्जा प्रकल्पाऐवजी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पच प्रकल्प हवा आहे. सरकारने भले ६६० मेगावॅटऐवजी २५० मेगावॉटचे दोन संच द्यावेत, पण प्रकल्प रद्द करू नये.
- शंकरराव धनवटे, अध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com