
पुणे (Pune) : प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या संदर्भाने सुरू असलेल्या 'शासकीय अधिकारी व बाधित शेतकरी संवाद' या प्रक्रियेस बाधितांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘विमानतळ आम्हांला नको तो रद्द करावा. या विषयाशिवाय दुसरी कोणतीही चर्चा आम्ही करणार नाही,’ असे सांगत सोमवारी (ता. १४) पारगाव मेमाणे व वनपुरी येथील ग्रामस्थ बैठक स्थळाकडे फिरकले नाहीत. असहकार दाखविण्यासाठी पारगावकरांनी ‘गावबंद’ पाळला. त्यामुळे कुंभारवळण, खानवडी पाठोपाठ आता या दोन्ही गावांतून शासकीय अधिकाऱ्यांना चर्चेविना परतावे लागले.
भैरवनाथ मंदिर सभागृहात नियोजन केलेल्या बैठकीत ‘विमानतळास शेतकऱ्यांचा विरोध आहे. पुरंदरचे विमानतळ रद्द करावे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे,' या आशयाचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आले. जमीन अधिग्रहणाची अधिसूचना व ७ गावे औद्योगिक क्षेत्र घोषित करत शासन विमानतळाच्या बाजूने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. विमानतळ प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी अधिकारी ग्रामस्थांशी संवाद करण्याचा प्रयत्न सध्या करत आहेत. शासनाच्या भूमिकेला विरोध व असहकार दर्शवण्यासाठी बाधित शेतकरी उपोषण, मोर्चा अशा सनदशीर मार्गाने विरोध मांडत आहेत. पारगावकरांनी स्वयंस्फूर्तीने, कडकडीत गाव बंद ठेवत विरोध दर्शविला.
अधिकारी गावात येण्यापूर्वीच ग्रामस्थ ग्रामदैवताचे दर्शन घेऊन निघून गेले. सर्व व्यवहार बंद होते. दुकाने, घरांना कुलपे लागली होती. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. यावेळी शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, महसूल उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, पोलिस निरीक्षक वाघचौरे, एमआयडीसी प्रतिनिधी सुनील दंडारे, अभियंता पी. भिसे, मंडल अधिकारी दुर्गादास शेळकंदे, तलाठी प्रांजली कुदळे, ग्रामसेवक दादासाहेब जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.