
पुणे (Pune) : पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडू नये, यासाठी पुणे महापालिकेच्या पथ विभागातर्फे अत्याधुनिक मायक्रो रिसरफेसिंग तंत्रज्ञान वापरून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चार वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावा पथ विभागाने केला आहे.
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून चाळण होते. वाहनचालकांची तारेवरची कसरत होते, अनेकदा अपघात ही होऊन वाहनचालक जखमी होतात. सध्या ही शहरातील रस्त्याची स्थिती वाईट आहे. अनेक रस्ते असमान पातळीत असल्याने वर्षभर त्रास होत आहे. पथ विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने पथ विभागाने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मायक्रो रीसरफेसिंगची कामे करण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. शहरातील ५० किलोमीटर रस्त्यांवर साधारणपणे तीन लाख ८० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर मायक्रो रीसरफेसिंग केले जाणार आहे, असे विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
पूर्व - पश्चिम भागात विभागणी
मायक्रो रीसरफेसिंगच्या कामाचे पूर्व व पश्चिम अशा दोन विभागात निविदा काढल्या जाणार आहेत. प्रत्येक भागासाठी साडेसात कोटी रुपयांची निविदा, असे दोन भागांसाठी १५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेच्या पूर्वगणनपत्रक समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
सेनापती बापट रस्त्यावर वापर
मायक्रो रीसरफेसिंगचे काम केल्याने पुढील तीन ते चार वर्षांत रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. पूर्वी हे तंत्रज्ञानाचा वापर करून काही रस्ते तयार केले आहेत. हे रस्ते आजही सुस्थितीत आहेत. सेनापती बापट रस्त्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, असेही पावसकर यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या ५० रस्त्यांवर मायक्रो रीसरफेसिंगची कामे केली जातील. त्यामुळे खड्डे पडणे, खडी उखडणे असे प्रकार घडणार नाहीत.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका