
पुणे (Pune) : राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (हाय सिक्युरीटी नंबर प्लेट -एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक केले आहे. वाहनधारकांनी ३१ मार्चपूर्वी ‘एचएसआरपी’ न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. ही पाटी बसवण्याची शेवटची तारीख जवळ आल्यामुळे नागरिकांनी घाई केली आहे. मात्र पाटी बनविणारी कंपनी आणि केंद्रातील गोंधळ कमी होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) त्यावर नियंत्रण नसल्यामुळे वाहनचालक संतप्त झाले आहेत.
शहरातील दांडेकर पूल परिसरातील एचएसआरपी केंद्र अचानक बंद पडल्याने शेकडो नागरिकांची तारांबळ उडाली. पूर्व नोंदणी केलेल्या तारखेनुसार एचएसआरपी बसविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. सर्व कामे सोडून उन्हामध्ये वितरकाकडे पाटी बसवण्यासाठी गेलो, मात्र केंद्र बंद असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. याला जबाबदार कोण?, आता पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याने आधी भरलेले शुल्क परत मिळणार का?, प्रशासनाच्या चुकीमुळे पाटी वेळेवर न बसविल्यास सवलत मिळणार का? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, ‘‘पाटी बसविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या तारखेनुसार अनेक नागरिक या केंद्रावर गेले. मात्र ते केंद्र बंद असून फलकावर ६ मार्चनंतरच्या पाटी बसविण्याची सुविधा रद्द केली आहे, अशी सूचना लावली होती. यासंदर्भात तेथील कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, ‘‘मला या संदर्भात कोणतीही माहिती नाही. बाहेर लावलेली नोटीस वाचा आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करा,’’ असे त्याने सांगितले. सूचना फलकावर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तीन तास प्रयत्न केल्यानंतर अखेर एका क्रमांकावर संपर्क साधण्यात यश आले. यावेळी ‘‘तुम्हाला नवीन वितरकाबाबत दोन ते तीन दिवसांत माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.’’ आमची कोणतीही चुक नसताना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आम्हाला दंड भरावा लागणार. त्यामुळे प्रशासनाने आमच्या सोयीने पुन्हा नोंदणी दिनांक मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वितरकांना वेळेवर पैसे मिळेनात
अचानक बंद पडलेल्या एका केंद्राचे संचालक चंद्रा राव म्हणाले, ‘‘ग्राहक `एचएसआरपी’साठी नोंदणी करतात. मिळालेल्या तारखेनुसार ते केंद्रावर येतात. मात्र संबंधित कंपनीकडून निश्चित वेळेमध्ये आम्हाला पाटी मिळत नाही. त्यामुळे वाहनचालकांची बोलणी आम्हाला ऐकावी लागते. तसेच नोंदणी केलेल्या कंपनीतर्फे वितरकांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
ग्राहकांनी उपस्थित केले प्रश्न...
१) हे केंद्र बंद झाल्यामुळे कोणत्या नवीन वितरकाकडे आमची पाटी गेली आहे, याबाबतची माहिती कधी मिळणार?
२) वितरकाने ६ मार्चपासून सेवा बंद केली आहे. त्यासंदर्भात आम्हाला का कळविले नाही?
३) या सर्व प्रकारामुळे झालेल्या मनस्तापासाठी जबाबदार कोण?
४) पुन्हा नोंदणी करायची असल्यास आधी भरलेल्या शुल्काचे काय?
५) पाटी वेळेत न बसविल्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे होणाऱ्या कारवाईला सामोरे जात नाहक दंड का भरावा?
दांडेकर पूल परिसरातील ‘एचएसआरपी’ वितरण केंद्र बंद झाल्यामुळे तेथे नोंदणी केलेल्या ग्राहकांना कोणताही अर्ज पुन्हा भरण्याची गरज भासणार नाही. या सर्व ग्राहकांना ‘एचएसआरपी’ कंपनीतर्फे दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येईल. त्यानुसार त्यांच्या नजीकच्या केंद्रावर त्यांच्या सोईनुसार ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी तारीख निश्चित करण्याची संधी दिली जाईल. कोणाचेही आर्थिक नुकसान होणार नाही.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक अधिकारी, पुणे