
पुणे (Pune) : पुणे शहरात पाणी टंचाई असताना महापालिकेचे वॉल्व्ह फिरवणारे काही कर्मचारी त्यात आणखी भर घालत आहेत.
त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत सोसायट्यांकडून दर महिन्याला चार-पाच हजार रुपये घेऊन त्यांना जास्तवेळ पाणी सोडले जात आहे. तर पैसे न देणाऱ्या सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा करून त्यांची कोंडी केली जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेतून शहरात सुमारे ३०० वॉल्व्ह बसविले जाणार आहेत, पण हे काम कागदावरच राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळकतकर, पाणीपट्टी भरूनही नागरिकांना पाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या त्रासाकडे प्रशासनासह राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून त्याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणे शहरातील पाण्याच्या टाक्यांमधून विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. टाकीतून पाणी सोडल्यानंतर कोणत्या भागात, किती वेळ पाणी सोडायचे? याचे वेळापत्रक तयार आहे, त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी वॉल्व्ह फिरवून पाणी सोडतात. त्यामुळे हे काम दिवसरात्र सुरू असते. या कर्मचाऱ्यांनी वेळेचे तंतोतंत पालन करून ज्या भागात पाणी सोडले जाणार आहे, तेथे पूर्ण वॉल्व्ह फिरवून पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे.
पण काही कर्मचारी त्यांना पैसे देणाऱ्या सोसायट्यांना जास्त दाबाने पाणीपुरवठा करतात, तर पैसे न देणाऱ्यांना कमी पाणी देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी कमी का येते, याचे कारण नागरिकांना समजत नाही. अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो अन् काही दिवसांनी पुन्हा कमी दाबाने पाणी येते.
टँकरवर खर्च करण्यापेक्षा
पाणी कमी पडल्यास सोसायट्यांना किमान एक हजार रुपये खर्च करून टँकर मागवावा लागतो. याचा महिन्याचा खर्च १० हजारांपासून लाखाच्या घरात आहे. त्यामुळे टँकरवर एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा सोसायटीचे पदाधिकारी वॉल्व्हमनला पैसे देऊन पूर्ण दाबाने पाणी घेतात. अन्य सोसायट्यांच्या पाण्याची यामुळे चोरी होते. पण त्याबाबत कोणीही तक्रार करत नाही.
टँकरमाफियांचाही फायदा
वॉल्व्हमनला ज्या सोसायट्या पैसे देत नाहीत, ते पाणी कमी पडल्याने टँकर मागवून गरज भागवतात. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमुळे सोसायट्यांना हजारो रुपयांना भूर्दंड बसून टँकरमाफियांचे भले केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्वयंचलित वॉल्व्ह कधी सुरू होणार?
समान पाणीपुरवठा योजनेतील लष्कर भागातील कामे सोडून उर्वरित सर्व भागांतील कामे पूर्ण होत आली आहेत. शहरातील पाण्याच्या टाक्याही कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण स्वयंचलित वॉल्व्ह बसविण्याच्या कामाला अजून गती आलेली नाही. शहरातील जुन्या आणि नव्या अशा १२५ पाण्याच्या टाक्यांच्या मुख्य जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविले जाणार आहेत. त्यात ‘अॅक्च्युएटर’ हे तंत्रज्ञान असून, ते स्काडा प्रणालीला जोडले जाणार आहे.
पाणी सोडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित केल्यानंतर रिमोटद्वारे पाणीपुरवठ्यावर नियंत्रण केले जाईल. तसेच एखाद्या भागात पाण्याचा दाब कमी ठेवायचा की जास्त करायचा, हे देखील आॅनलाइन करता येणार आहे. विमाननगर, बाणेर-बालेवाडीतील काही टाक्यांवर स्वयंचलित वॉल्व्ह बसविले आहेत. उर्वरित शहरात हे वॉल्व्ह बसवून त्यांचा वापर सुरु करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
सोसायट्यांनी गळती थांबवावी
अनेक सोसायट्यांच्या भूमिगत पाण्याच्या टाक्या जुन्या झाल्या असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. टाक्या लवकर भरत नाहीत, टाक्या भरल्या तरी पाणी कमी होते. तसेच इमारतीवरील टाक्या भरून पाणी वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी बॉल कॉक लावणे आवश्यक आहे. तसेच इमारतीच्या अंतर्गत जलवाहिनीतून पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे. याकडे सोसायट्यांनी लक्ष दिल्यास पाणी कमी पडणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेने स्वयंचलित वॉल्व्ह बसवून बाणेर-बालेवाडीत त्याचा वापर सुरु केला आहे. त्याच्या चाचणीसाठी तीनपट पाणी जास्त सोडले, पण जेवढे पाणी सोडले तेवढ्या पाण्याचा वापर नागरिक करत आहेत. त्यामुळे सर्वच भागात पाण्याला योग्य दाब राहिला नाही. सोसायट्यांच्या टाक्यांमधील गळतीही थांबणे आवश्यक आहे. वॉल्व्हमनकडून पैशांची मागणी होत असले तर त्याबाबत तक्रार करावी. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
महापालिकेचे अधिकारी आणि पाणी सोडणारे काही कर्मचारी सोसायट्यांकडून पैसे घेत असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. महापालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घातले तर शहरातील पाणी टंचाईबाबत त्यांना सर्व बाजू लक्षात येतील.
- महेश पोकळे
समान पाणीपुरवठा योजना
८६ - नियोजित टाक्या
६६ - बांधून तयार टाक्या
१२६८ किलोमीटर - जलवाहिन्यांची आवश्यकता
१०८५ किलोमीटर - टाकलेल्या जलवाहिन्या
२,३२,६७ - मीटर बसविणार
१,७९,५१६ - मीटर बसविले
२४०० कोटी रुपये - योजनेचा खर्च