
मुंबई (Mumbai) : येथून पुढे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी असेल, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी नुकतीच दिली. आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
मंत्री सरनाईक यांनी मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात जाऊन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी ‘यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल’, असा शब्द दिला. आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६ टक्के देता आले, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
निधी अभावी स्वच्छता थांबणार नाही
‘‘एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख आणि दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय आम्ही घेणार आहोत. निधीचे कारण सांगून स्वच्छतेला बगल दिली जाणार नाही. सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ आणि निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर आणि नवीन येणाऱ्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे या वर भर देणार आहे,’’ असे सरनाईक यांनी सांगितले.
मिडी बस घेणार
यंदा दोन हजार ६४० लालपरी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ‘‘सध्या तीन हजार नवीन बसची टेंडर प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात उपयुक्त ठरेल, अशा मिडी बस घेण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी २०० अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील,’’ अशी माहितीही त्यांनी दिली.
१२० कोटी रुपयांचा निधी वितरित
एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला ४४ टक्के पगार देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने १२० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला. तसेच उरलेले ९४६ कोटी रुपये तीन टप्प्यांमध्ये महामंडळाला दिले जाणार आहेत.
एकही योजना बंद करणार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीने सुरू केलेल्या सवलतीच्या योजनांवर बोट ठेवल्यामुळे या योजना बंद करणार का, अशी विचारणा मंत्री सरनाईक यांच्याकडे करण्यात आली. यावर, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली एकही योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करतानाच उलट आणखी काही योजना सुरू करण्याचे सूतोवाच सरनाईक यांनी केले.