
पुणे (Pune) : ‘तुम्ही शेतजमीन खरेदी केली आहे, त्यांची दस्तनोंदणीदेखील झाली आहे, फेरफार उताऱ्यावर त्यांची नोंद घेण्यासाठी आता तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे पाठपुरावा करावा लागू नये याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ‘आय सरिता’ आणि भूमी अभिलेख विभागाची ‘ई-फेरफार’ या दोन संगणकप्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत.
त्यामुळे दस्त झाल्यानंतर ऑनलाइन फेरफारवर नोंद घेतली जाणे अपेक्षित होते. या दोन्ही संगणकप्रणाली एकमेकांशी जोडल्यामुळे तलाठ्यांना स्वतःहून फेरफार नोंदी घालण्याची गरज राहत नाही. परिणामी अशा नोंदी घेण्यास टाळाटाळ करण्याचा प्रश्नच निकाली निघाला आहे. याशिवाय फेरफार नोंदी घेण्यासाठी यापूर्वी सुमारे शंभर दिवसांचा कालावधी लागत असे, तो कालावधी वीस ते पंचवीस दिवसांवर आला आहे.
राज्याचा महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने एकत्रित येत सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिकांवर फेरफार नोंदी घेण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला होता.
या प्रणालीचे कामकाज आता अंत्यत फलदायी झाले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्तनोंदणीसाठी सध्या ‘आय सरिता’ या सॉफ्टवेअर संगणक प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीच्या माध्यमातून खरेदी-विक्री, हक्कसोड, बोजा कमी करणे अथवा चढविणे आदी प्रकाराच्या दस्तनोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते.
दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दस्तनोंदणी झाल्यानंतर ‘ऑटो ट्रिगर’ पद्धतीने जमीन विकणारा आणि खरेदी करणाऱ्याचे नाव, कुठली जमीन आणि किती क्षेत्र, दस्तामध्ये दर्शविण्यात आलेले जमिनीचे मूल्य आणि हा व्यवहार कधी झाला आदी सर्व प्रकारच्या माहितीचा मजकूर तयार केला जातो. तो मजकूर महसूल विभागाच्या ‘ई-फेरफार’ या संगणक प्रणालीला पाठविला जातो.
त्यानंतर तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटीस काढली जाते आणि मंडळ अधिकारी यांच्या मंजुरीने नोंद घेतली जाते. त्या नोंदीचा अंमल सातबारा उताऱ्यावर आपोआप घेण्यात येतो.
ग्रामीण भागात सातबारा उतारा, तर शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) असे दोन प्रकाराचे अभिलेख आहेत. ‘आय सरिता’, ‘ई-फेरफार’ आणि शहरी भागासाठीची ‘ई-पीसीआयसी’ या तीनही संगणकप्रणाली एकमेकांशी संलग्न करून ग्रामीण भागात सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका उताऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्याचे काम या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील राज्य संचालक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी दिली.
नागरिकांचा नेमका काय फायदा
-दस्तनोंदणी झाल्यानंतर दस्तातील माहिती महसूल विभागाला ऑटो ट्रिगरपद्धतीने प्राप्त
-फेरफार मंजुरीनुसार संगणकप्रणालीच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर अमलाची नोंद होणार
- तलाठ्यांकडे फेरफार नोंदीसाठी पाठपुराव्याची गरज राहणार नाही
-फेरफार नोंदी घेण्याचा कालावधी शंभर दिवसांवरून २० ते २५ दिवसांवर
-नोंदी घेण्यास टाळाटाळ करण्याची संधी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना नाही