
पुणे (Pune) : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) राजाराम पूल ते धायरी या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एका महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
सिंहगड रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नागरिकांची कोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल ते धायरी या मार्गावर सप्टेंबर २०२१ मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू केले. महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून डिसेंबर २०२५ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते. संबंधित काम गतीने करण्यात येत आहे. आता पुलाचे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे.
विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख म्हणाले, ‘‘पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता रंगरंगोटी, पथदिवे व दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. एका महिन्यात हे काम पूर्ण होईल.’’