
पुणे (Pune) : वाहतूक कोंडी अन् पार्किंगमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांनी शहरात प्रवासासाठी कॅबला प्राधान्य दिले. परिणामी पुण्यात कॅबची संख्या ६० हजार तर त्याद्वारे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच लाखांच्या घरात पोचली.
असे असले तरी काही कॅब चालकांचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुण्यातील कॅबमध्ये अस्वच्छता आढळून येत आहे. शिवाय जुनाट मोटारी, सीटवर घाण तसेच धुळ आढळून येत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध असले तरीही प्रवासी कॅबला प्राधान्य देत आहेत. मात्र हा प्रवास गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना असह्य होत आहे. कॅबमधील अस्वच्छता, खराब सीट, दुर्गंधी, जुनाट झालेली मोटार या गैरसोयींमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. प्रवाशांच्या सोयीबद्दल कॅब चालक व संबंधित कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आपला संताप समाज माध्यमावर नोंदवीत आहेत.
काय आहेत समस्या
१) काही कॅबमध्ये स्वच्छतेची कमतरता दिसून येते. मोटारीत स्वच्छता नसते. सीटवर धूळ, घाण आढळते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. या त्रासामुळे प्रवास नकोसा होत आहे.
२) काही चालक जुन्या आणि खराब स्थितीतील मोटारी वापरतात. त्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा( एसी) व्यवस्थित चालत नाही. सीट खराब असतात आणि मोटारीच्या आतील स्थितीही फारशी चांगली नसते.
३) कोणत्याही प्रकारची मोटार निवडली तरी भाडे तेच असल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते.
सौजन्याची ऐशी-तैशी...
- छोट्याशा कारणांवरून प्रवासी व कॅब चालकांमध्ये वाद होतात.
- अशावेळी प्रवासातच ट्रीप रद्द करण्याची काही चालकांकडून धमकी दिली जाते.
- रेल्वे व बस स्थानक अथवा विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांकडे मोठी बॅग व अन्य साहित्य असते. अशाप्रसंगी काही कॅब चालक बॅग ठेवण्यासाठी अथवा उतरविण्यासाठी प्रवाशांना मदत करत नाहीत.
सध्या कॅबचे भाडे रिक्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कॅबचा व्यवसाय तोट्यात आहे. परिणामी चालकांचे उत्पन्न घटले आहे. या सर्वांचा परिणाम चालकांच्या मानसिकतेवर झाला आहे. यातूनच एसी बंद ठेवणे, मोटार अस्वच्छ ठेवणे यांसारखे प्रकार घडत आहेत.
- बिरुदेव पालवे, अध्यक्ष, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना
कॅब चालकांनी प्रवाशांना प्राथमिक सुविधा दिल्या पाहिजेत. नाहीतर कॅबचे प्रवासी दुरावतील. मोटारीत एसीऐवजी पंखा लावणे ही प्रवाशांची फसवणूक आहे. असे प्रकार थांबणे आवश्यक आहे.
- नीलेश गायकवाड, प्रवासी
आम्ही रविवारी दुपारी भारती विद्यापीठापासून वाकडेवाडी स्थानकावर जाण्यासाठी कॅब बुक केली. मात्र चालकाने एवढ्या उन्हातही एसी सुरू केला नाही. त्याला दोनवेळा आठवण केल्यानंतर त्याने एसी सुरू केला.
- ऊर्मिला मुळे, प्रवासी