.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : हद्दीत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए - PMRDA) लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रस्त्याचे काम देण्यात आलेल्या ठेकेदाराने (Contractor) काम केल्यानंतर निर्धारित कालावधीत रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदारावर असणार आहे.
‘पीएमआरडीए’चे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे सातत्याने विविध विकास कामे सुरू असतात. संबंधित कामे उत्कृष्ट आणि दर्जेदार व्हावी, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले. यात प्राधिकरणाने विकसित केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत निर्धारित कालावधीपर्यंत संबंधित ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केला असतो. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दोष दायित्वाचा कालावधी रस्त्याच्या कामानुसार ३ ते ५ वर्षाचा आहे. यादरम्यान रस्ता खराब झाल्यास तो संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
दीडशे किलोमीटर रस्त्यांची कामे...
प्राधिकरणाच्या माध्यमातून २०१९-२० ते २०२३-२४ पर्यंत एकूण १४८ किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांची कामे झाली आहेत. यात मावळ तालुक्यात १४.५३, खेड १५.२४, मुळशी १४, भोर ७.२५, वेल्हे ५.३५, हवेली २६.३, पुरंदर २२.२१, दौंड ७.८५ आणि शिरूर तालुक्यात ३५.५ किलोमीटरची रस्त्यांची कामे विविध ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आली.
तालुकानिहाय कामांची संख्या...
नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हाभरात ९२ रस्त्यांची कामे झाली आहेत. यात सर्वाधिक कामे हवेली, पुरंदरसह शिरूर तालुक्यातील आहे. यांसह मावळ, खेड आणि वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी ६, मुळशी ९, भोर ८, हवेली २६, दौंड ५, पुरंदर व शिरूर प्रत्येकी १३ रस्त्यांची कामे करण्यात आली.
जिल्हाभरात ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली. संबंधित रस्ते दर्जेदार व्हावेत, या उद्देशाने ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केला आहे. रस्ते खराब झाल्यास, संबंधित गाव, भागातील नागरिकांनी याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अर्ज करावे.
- डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए