
पुणे (Pune) : पुणे ते शिरूर या टप्प्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ५३.४ किलोमीटर लांबीचा व सुमारे सहा हजार कोटींचा उन्नत मार्ग मंजूर करण्यात आला, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असली, तरी या प्रकल्पातील सुरवातीच्या टप्यातील शिक्रापूर ते शिरूरपर्यंत सहापदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. हे काम न करताच उड्डाणपुलाची कामे सुरू केल्यास संभाव्य प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जनतेच्या होणाऱ्या प्रचंड रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा आमदार माउली कटके (Mauli Katke) यांनी दिला.
पुणे-शिरूर उन्नत मार्ग प्रकल्पासंबंधी विषयांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात आमदार कटके यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. यावेळी आमदार कटके यांनी या प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्दे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ते म्हणाले, ‘‘हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला असून, प्राधिकरणाकडे रस्ता हस्तांतरित झाल्याने या कामाच्या निविदाही काढल्या आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत खराडी जकात नाका ते शिक्रापूरपर्यंत (२६ किलोमीटर) सहापदरीकरणाचे काम पूर्ण केले. परंतु, त्यापुढील दुसऱ्या टप्प्यातील शिक्रापूर ते शिरुरपर्यंतचे (२७ किलोमीटर) काम अद्याप झालेले नाही. हा टप्पा लक्षात घेता याअंतर्गत नागरिकरण, तसेच औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे, त्यामुळे उन्नत मार्ग प्रकल्पांतर्गत पुलाची कामे सुरू करण्यापूर्वी शिक्रापूर ते शिरुरपर्यंतच्या रस्त्याचे सहापदीकरणाचे काम पूर्ण करणे गरजेचे ठरणार आहे. तत्पूर्वी पुलांचे कामे सुरू केल्यास याकरीताच्या लागणाऱ्या मोठ्या साधनसामग्रीतूनच प्रचंड वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांच्या सुटकेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या उन्नत मार्गाचा मूळ उद्देशच मागे पडेल, यातून प्रचंड जनआक्रोश निर्माण होऊ शकतो.
हायब्रीड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत पुणे ते शिरूर एकूण ५३.४ किलोमीटर लांबीचा रुपये ४६२ कोटी इतक्या किमतीचा प्रकल्प मंजूर आहे. यामध्ये केवळ २६ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून, मंजूर प्रकल्पामधून उर्वरित २४.४ किलोमीटर लांबीचे काम हाती घेता येऊ शकेल. मुळ मंजूर प्रकल्पामधून उर्वरित लांबीचे सहापदरीकरणाचे काम त्वरित हाती घेण्यास संबंधितांना आदेश द्यावेत.
- ज्ञानेश्वर कटके, आमदार