
हिंजवडी (Hinjawadi) : हिंजवडी आयटी पार्कमध्ये (Hinjawadi IT Park) मंगळवारी (ता. १७) पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खराब रस्ते, चिखल आणि मोठे खड्डे यामुळे ऑफिसच्या वेळेत दोन ते तीन तास कोंडी होऊन तब्बल ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. ही कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सूचना करूनही अधिकारी अजूनही निरुत्साही असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
हिंजवडी-माण आयटी पार्कमध्ये आधी पावसाचे पाणी आणि आता खड्डे हे आयटीयन्सचे वैरी बनले आहेत. आयटी परिसरात मंगळवार कोंडीचा वार ठरला. दिवसभर झालेल्या प्रचंड कोंडीमुळे ‘आगीतून उठून फुफाट्यात’ अशी अवस्था झाली. खड्ड्यांमधून वाट काढताना दमछाक झाली. सर्वच रस्त्यांवर सकाळी ११ ते २ व दुपारी ४ ते ८ यावेळेत कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. इतके दिवस पावसाच्या पाण्यामुळे खड्डे दिसत नव्हते. मात्र, मंगळवारी ऊन पडल्याने रस्त्यांची बिकट अवस्था समोर आली.
वाहतूक कोंडी होणारे परिसर
माण - हिंजवडी रस्ता, माण गाव ते फेज तीन, फेज तीन ते फेज दोन, विप्रो सर्कल ते फेज १ ते ॲमस्टरडॅम हॉटेल, ॲमस्टरडॅम हॉटेल चौक ते मेझा नाईन - शिवाजी चौक, शिवाजी महाराज चौक ते वाकड, लक्ष्मी चौक ते भूमकर चौक-काळा खडक इत्यादी रस्ते.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे...
हिंजवडीतील वाहतुकीसंदर्भातील सर्व कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या गांभीर्याने घेतल्या का नाही? असा प्रश्न पडला आहे. खड्डे बुजवण्याचे काम किती दिवस रखडणार? असा सवाल विचारला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात ठोस आणि चांगले उपाय केले जात नाहीत. खड्डे बुजवण्याचे काम अजून रखडले आहे. ‘पीएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी या रस्त्याने एकदा प्रवास करावा, म्हणजे आमचे दुःख समजेल.
- आनंद चौगुले, आयटीयन्स रहिवासी, माण
अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे जागतिक दर्जाच्या आयटी पार्कला समस्यांचे ग्रहण लागले आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तरी या समस्येबाबत गंभीरपणे सूचना द्याव्यात.
- वसंत साखरे, ग्रामस्थ, हिंजवडी
नागरिकांच्या अपेक्षा...
- खड्डे तत्काळ बुजवावेत, डांबरीकरण करावे
- पर्यायी मार्गांची कामे तातडीने पूर्ण करावीत
- सांडपाणी आणि नाल्यांची सफाई
- अतिक्रमणे हटवून रस्त्यांची रुंदी वाढवावी
- मेट्रो प्रकल्पाच्या जागेवर वाहतुकीचे नियोजन
- अवजड वाहनांना बंदी घालावी