
पुणे (Pune) : आशिया खंडातील सर्वाधिक उंच म्हणजे १३० मीटर उंचीच्या केबल ब्रिजवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षात पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे आणखी जवळ येणार आहेत. या दोन्ही शहरांतील अंतर कमी करणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे.
लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले.
प्रकल्प का महत्त्वाचा?
- या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा कि.मी. वळणाच्या मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार
- त्यासाठी दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम
- बोगद्याची रुंदी २३.५ मीटर
- मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा
- पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा असणार
- या दोन्ही बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण
- याच प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या केबल ब्रिजची लांबी ६४५ मीटर आणि उंची २१० मीटर असणार
- त्यामध्ये १३० मीटर उंचीवरील पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू
- हे काम येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल
महत्त्वाचे
- आशिया खंडातील हा सर्वांत मोठा दरीवरील पूल असल्याचा ‘एमएसआरडीसी’चा दावा
- पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे.
- प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांनी बचत होणार आहे.
दृष्टिक्षेपात
- आशिया खंडातील सर्वांत मोठा म्हणजे २१० मीटर उंचीचा केबल ब्रिज उभारण्याचे काम ८७ टक्के पूर्ण
- १३० मीटर उंचीवर पुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू
- खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता होणार
- १.६ किलोमीटर लांबीचा तर दुसरा नऊ किलोमीटर लांबीचे पाच पदरी अशा दोन बोगद्यांची ९० टक्के कामे पूर्ण
- या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार
- प्रवाशांच्या वेळेत २० ते २५ मिनिटांनी बचत होणार
पुढील तीन-चार महिन्यांत मिसिंग लिंकचे काम पूर्ण होऊन जून ते जुलैदरम्यान प्रत्यक्षात तो वाहतुकीसाठी खुला होईल.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी