.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाडीचे नियोजन विस्कळित झाले आहे. जुळे सोलापुरातील अनेक नगरांमध्ये दहा दिवसाला एकदा घंटागाडी येते.
याबाबत घंटागाडी चालकाला याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून मी रोजच येतो, तुम्हीच जागेवर नसता अशी उलट उत्तरे देत, रहिवाशांकडेच बोट दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक रहिवाशांच्या घराला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरी भागापेक्षाही हद्दवाढ भागात सध्या घंटागाडीचे नियोजन विस्कळित झाल्याने अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयाच्या परिसरातील नगरांमध्ये सध्या दहा दिवसांआड घंटागाडी येत आहे. त्यामुळे नागरिकांसमोर घरात साचलेला कचरा टाकायचा कुठे? हा प्रश्न आहे.
नाइलाजास्तव अनेक रहिवाशांना कचरा रस्त्याकडेला अथवा ज्याठिकाणी खुली जागा दिसेल, त्याठिकाणी टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्याठिकाणीही कचरा साचत आहे. खुल्या जागेतील कचरादेखील दररोज व्यवस्थित संकलित न झाल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने एकीकडे स्वच्छता मोहीम २.० राबवताना शहरातील प्रमुख रस्ते व चौक स्वच्छ केले आहेत. त्याकामी जवळपास २५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
दुसरीकडे मात्र स्वच्छता मोहीम राबवताना घंटागाडीचे नियोजन मात्र विस्कळित झाल्याचा फटका शहरवासीयांना विशेषकरून हद्दवाढ मधील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
ठळक समस्या...
दहा दिवसांआड घंटागाडीद्वारे कचरा संकलन
घरात ओला व सुका कचरा साचल्याने दुर्गंधी
खुल्या जागेत कचरा टाकल्याने परिसरातही दुर्गंधी
घंटागाडी अनियमित वेळी आल्याने नोकरदारांची गैरसोय
अनेक ठिकाणी स्वखर्चाने कचरा संकलन
महापालिका प्रशासनाची समस्येकडे डोळेझाक
खुल्या जागेत टाकलेला कचरा महापालिकेने संकलित करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली जात असली तरी हद्दवाढ मधील अनेक ठिकाणी साचलेला कचरा जाळला जात आहे. एकीकडे कचरा संकलनाची समस्या तर दुसरीकडे कचरा जाळण्याचा प्रकार यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर साचलेला कचरा महापालिकेने स्वच्छता मोहिमेद्वारे हटवून त्याठिकाणी स्वच्छता केली आहे. त्याच धर्तीवर घंटागाड्यांच्या नियोजनाबाबत देखील एखादी मोहीम राबवणे गरजेचे असल्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.