
सातारा (Satara) : पावसाळ्यात पाच तालुक्यांत येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती सौमीकरण आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत होणारी कामांसाठीची टेंडर प्रक्रिया सुरू होत आहे. एकूण १६० कोटींचा निधीस मान्यता मिळाली आहे. ही सर्व कामे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात दरड कोसळणाऱ्या ठिकाणी रेलिंग व जाळी बसविणे, पूर रेषेजवळ नदीला संरक्षण भिंत घालणे, डोंगर घाटातील नाल्यांचे खोलीकरण आदी बाबींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई, तालुक्यांत पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळणे, भूस्खलन, घाट रस्त्यावर पाणी येणे, नदीला पूर आल्यावर पाणी गावात शिरल्याने रस्ते बंद होणे असे प्रकार होतात. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आपत्ती सौमीकरण आराखडा तयार करून त्यावर उपाय योजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १६० कोटींच्या निधीस मान्यता मिळाली आहे. या आराखड्यातून होणाऱ्या कामांसाठी आता २०२५-२६ मध्ये टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात दुर्गम तालुक्यातील नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे सोपे होणार आहे.
या आराखड्यानुसार आता दरड कोसळणाऱ्या भागात जाळी बसविणे, रेलिंग बांधणे, तसेच डोंगर घाटातील नाल्यांचे खोलीकरण करणे, तसेच घाटातील धोकादायक दरडी हटविणे, भूस्खलित भागातील नागरिकांना स्थलांतरित करणे, नदीकाठच्या भागात संरक्षण भिंत बांधणे आदी विविध कामांचा समावेश आहे. यामध्ये पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर व वाई तालुक्यातील कामांचा समावेश आहे. आपत्ती सौमीकरणाची ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांच्याकडून केली जाणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळून रस्ते बंद होणे, भूस्खलन, घाटात पाणी येणे आदी बाबी पावसाळ्यात होण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. महत्त्वाच्या व नेहमी दरड कोसळणाऱ्या घाट रस्त्यांना विशेष प्राधान्य राहणार आहे. या कामांवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.
आपत्ती सौमीकरणांतर्गत होणारी विविध विकासाची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, जेणे करून पावसाळ्यात नागरिकांना आपत्तीपासून होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागणार नाही.
- संतोष पाटील, जिल्हाधिकारी