
कऱ्हाड (Karhad) : राज्याचे पर्यटन जागतिक स्तरावर नेण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. राज्यातील जल-वन पर्यटन, थंड हवेची ठिकाणे या संदर्भातील पर्यटनाचा जागतिक दर्जाचा आराखडा करणार आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर एजन्सी नेमून त्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. माजी सैनिक विभागाचे कामकाज उद्या (मंगळवारी) जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे येथून तर पर्यटन विभागाच्या कामाचा प्रारंभ बुधवारी (ता. २५) प्रतापगडावरून करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच मतदारसंघात आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देसाई म्हणाले, ‘‘महायुतीला विधानसभेत प्रचंड बहुमत मिळालेले आहे. सर्वांचे आशीर्वाद महायुतीला लाभलेले आहेत. मी पहिल्यांदाच मतदारसंघात आल्यावर जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे. त्या स्वागताचा मी नतमस्तक होऊन स्वीकार करत आहे. राज्यात पर्यटनाची अनेक मोठी ठिकाणे आहेत. त्याला जागतिक दर्जा देण्यासाठी मी या खात्याचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार आहे.’’
सातारा हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याने देशाच्या संरक्षणात मोठे योगदान दिले आहे. मिलिटरी अपशिंगे गावातील घरटी एक माणूस सैन्यदलात आहे. त्यामुळे माजी सैनिक कल्याण विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मी त्या गावात जाणार आहे. माजी सैनिकांच्या संदर्भातील जे प्रश्न, कामे प्रलंबित आहेत, त्याचा आढावा मी घेणार आहे. तेथूनच माजी सैनिक कल्याण विभागाच्या कामाचा प्रारंभ करणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिटरी अपशिंगेसंदर्भात काही आदेश दिले होते. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते झालेले नाही. त्याला आता गती देण्यात येणार आहे. पर्यटन विभागाच्या कामाचा प्रारंभ प्रतापगडावर करणार असल्याचे सांगून देसाई म्हणाले, ‘‘प्रतापगडावर पर्यटन विभागाचे अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी घेऊन जाणार आहे. तेथून पर्यटन विभागाचे कामकाज सुरू करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड संवर्धनासाठी प्रस्ताव मंजूर केला आहे. तो गतीने पुढे न्यायचा आहे. त्यात अधिक सुधारणा करायच्या आहेत.’’
जिल्ह्यात मोठा वाव
जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. कोयना जलपर्यटनाचा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. निवडणुकीपूर्वी त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याची बैठक लवकरच मुंबईत घेणार आहे. पाटण तालुक्यात कोयना जलपर्यटन, कोयना परिसर, व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटनाला प्राधान्य देणार आहे. साताऱ्यातील कास पठार, बामणोली, वासोटा, महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा अशी अनेक पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा आहे. लवकरच त्या कामांना गती मिळालेली दिसेल.’’
पालकमंत्रिपद कोणाला द्यायचे, याबाबत कोणतीही चढाओढ सुरू नाही, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, ‘‘कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला द्यायचे, याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार ठरवणार आहेत. लवकरच त्यांच्याकडून त्याबाबतची घोषणा केली जाईल.’’
- शंभूराज देसाई, मंत्री, पर्यटन व माजी सैनिक कल्याण विभाग.