
मुंबई (Mumbai) : घोडबंदर ते भाईंदर रस्ता आणि उन्नत मार्ग प्रकल्पाच्या 14 हजार कोटींच्या कामात तत्कालीन शिंदे सरकारने कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला.
हे टेंडर काढताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर होते. नगरविकास खातेही त्यांच्याकडेच होते. त्यामुळे 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्याची काळजी असल्यास या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन नैतिकता दाखवावी, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना दिले. हा घोटाळा 'चंदा दो, धंदा लो' या स्किमचे उदाहरण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मर्जीतल्या कंत्राटदाराला फायदेशीर ठरणाऱ्या अटी-शर्ती बनवल्याचे लक्षात आल्यानंतर मी हा घोटाळा उघड केला होता. यानंतर 'एमएमआरडीए'ने या अटी बदलल्या होत्या. त्यामुळे या 'मेघा' घोटाळ्यातील मंत्री शिंदेंना मंत्रीपदावरून हटवा आणि ईडी, आयटी किंवा न्यायालयीन चौकशी करा. तोपर्यंत त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवा, अशी मागणीही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
घोडबंदर-भाईंदर मार्गासाठी गतवर्षी 14 हजार कोटींची टेंडर एमएमआरडीएकडून काढण्यात आल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी या कामातील घोटाळा उघड केला. सर्व नियमांची पायमल्ली करीत या टेंडरसाठी केवळ 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला. याबाबत मी आवाज उठवल्यानंतर हा कालावधी 60 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला. शिवाय या कामासाठी आरबीआयची मान्यता नसलेल्या सेंट लुसिया देशामधील बँकेची 1600 कोटींची 'बँक गॅरंटी' घेण्यात आली होती. हा प्रकारही आपण उघड केला होता. या टेंडरमध्ये अनियमितता झाल्यामुळेच सरकारवर टेंडर नव्याने राबवण्याची नामुष्की आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. निवडणूक काळात भाजपला 600 कोटींचे 'दान' देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगला कंत्राट देण्यासाठी गोलमाल करणारे महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात तोंडावर आपटले. या मार्गासाठीची टेंडर रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. त्यामुळे घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणाऱ्या कंपनीचेही आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले.