Railway Over Bridges: तीन वर्षांत 145 उड्डाणपूल उभारून महाराष्ट्र 'रेल्वे फाटक मुक्त' करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपुरात ४८४ कोटींच्या ९ पायाभूत सुविधांचे शानदार लोकार्पण; 'महारेल'च्या पेटंटेड तंत्रज्ञानामुळे पुलांच्या कामाला वेग; पारडी उड्डाणपुलासह भाजी मार्केटसाठी १५० कोटींचा निधी मंजूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra FanavisTendernama
Published on

नागपूर (Nagpur): राज्यातील रेल्वे फाटकांवर होणारे अपघात पूर्णपणे रोखण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरक्षित व वेगवान करण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ नवीन रेल्वे उड्डाणपुलांचे (ROBs) काम पूर्ण केले जाईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र 'रेल्वे फाटक मुक्त' केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर येथील वर्धमाननगर रेल्वे क्रॉसिंगवरील चारपदरी उड्डाणपुलासह राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या एकूण ९ महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde: मुंबईतील 1,700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण; खड्डे दुरुस्तीचा 80 टक्के खर्च वाचला!

राज्यातील जनतेला अत्याधुनिक, सुरक्षित आणि गतिमान दळणवळण सुविधा पुरवतानाच रेल्वे फाटकांजवळ होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. दरवर्षी रेल्वे फाटकांशी संबंधित विविध अपघातांमध्ये सुमारे २१ हजार नागरिकांचा मृत्यू होतो, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि महाराष्ट्राला पूर्णपणे 'रेल्वे फाटक मुक्त' करण्यासाठी जलद गतीने काम सुरू आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल - MRIDC) या विशेष कंपनीच्या स्थापनेमुळे राज्यातील रेल्वे आणि रस्त्यांच्या पायाभूत विकासाला अभूतपूर्व गती मिळाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर येथील वर्धमाननगर रेल्वे क्रॉसिंगवरील चारपदरी उड्डाणपूल तसेच राज्यातील एकूण ४८४ कोटी रुपयांच्या ९ विविध पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी आणि 'महारेल'चे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai Bandra Connector: मुंबईत वांद्रे सागरी सेतू ते वांद्रे किल्ला कनेक्टर; 45 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांवर येणार

तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल
राज्यात सध्या ५२४ रेल्वे फाटकांची तांत्रिक आवश्यकता आहे. त्यापैकी अत्यंत वर्दळीच्या आणि १० हजारांपेक्षा जास्त टीव्हीयू (Train Vehicle Unit) वाहतूक असणाऱ्या १२१ फाटकांसह एकूण १४५ रेल्वे फाटकांवर पुढील तीन वर्षांत उड्डाणपूल बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. हे सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'महारेल'च्या माध्यमातून अत्यंत वेगवान पद्धतीने पूर्ण केले जातील. महारेलने रेल्वे उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी अत्यंत कमी खर्चात आणि वेगाने काम करणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले असून त्याचे पेटंट देखील मिळविले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या संस्थेच्या कामगिरीचे कौतुक केले.

४८४ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
नव्याने सुरू झालेल्या ४८४ कोटी रुपयांच्या या ९ पायाभूत सुविधांमध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३ रोड ओव्हर ब्रिज (ROB), ४ सबवे आणि १ अंडरब्रिज यांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर येथील दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधीअंतर्गत (CRIF) पूर्ण करण्यात आले आहेत; तर उर्वरित ७ प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या ५०:५० टक्के अशा समसमान खर्च वाटप तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहेत. दरम्यान, भगवान संभनाथ चौक ते डेप्युटी सिग्नल मार्गावरील नवनिर्मित रेल्वे ओव्हर ब्रिजला नागपूरचे माजी उपमहापौर बाहारीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on the Spot: मुंबई ते गुजरात प्रवास होणार आणखी जलद; 58 हजार कोटींच्या उत्तन-विरार सागरी सेतूचा मुख्यमंत्र्यांकडून...

गडकरींकडून १५० कोटींची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाचे कौतुक करताना पारडी येथील उड्डाणपुलाच्या कामासह स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आधुनिक भाजी मार्केट आणि स्पोर्ट्स क्लब उभारण्याची मोठी घोषणा केली. या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयांच्या एकूण खर्चापैकी ४० कोटी रुपयांचा निधी एनएचएआय (NHAI) तर्फे दिला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पूर्व नागपूर परिसरात कचऱ्यापासून सीएनजी (CNG) निर्मिती का मोठा प्रकल्प सुरू होत असून, यामुळे शहराच्या पर्यावरण संवर्धनाला आणि दळणवळणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mission Mumbai 2047: AI रोखणार नालेसफाईतील गैरव्यवहार रोखणार; दोषी कंत्राटदारांना कोट्यवधींचा दंड

Key Points Summary

  • येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्र 'रेल्वे फाटक मुक्त' करणार.

  • नागपुरात रेल्वे क्रॉसिंगवरील चारपदरी उड्डाणपुलासह राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत प्रकल्पांचे लोकार्पण.

  • यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर व चंद्रपूरमधील ३ रोड ओव्हर ब्रिज (ROB), ४ सबवे आणि १ अंडरब्रिजचा समावेश.

  • रेल्वे फाटकांवर होणारे अपघात रोखण्यासाठी आणि वार्षिक २१ हजार मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रकल्पांना प्राधान्य.

  • 'महारेल'ने कमी खर्चात आणि वेगवान पूल बांधणीचे नाविन्यपूर्ण पेटंटेड तंत्रज्ञान विकसित केले.

  • भगवान संभनाथ चौक ते डेप्युटी सिग्नल उड्डाणपुलाला माजी उपमहापौर बाहारीनबाई सोनबोईर यांचे नाव दिले.

  • पूर्व नागपूरमध्ये पारडी उड्डाणपुलासह अत्याधुनिक भाजी मार्केट व स्पोर्ट्स क्लबसाठी १५० कोटींचा प्रकल्प घोषित; एनएचएआय ४० कोटी देणार.

  • या एकूण प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या ५०:५० खर्चाच्या तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहेत.

Tendernama
www.tendernama.com