Eknath Shinde: मुंबईतील 1,700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण; खड्डे दुरुस्तीचा 80 टक्के खर्च वाचला!

मुंबईत यंदा ‘शून्य जीवितहानी’चे उद्दिष्ट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यंत्रणांना निर्देश
Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई: मुंबई आणि महानगर परिसरात आगामी पावसाळ्यात ‘शून्य जीवितहानी’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी परस्परांच्या समन्वयातून आणि एक संघ म्हणून काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, मुंबईतील एकूण २,००० किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल १,७०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचा महापालिकेचा सुमारे ८० टक्के खर्च कमी झाल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.

Eknath Shinde
द्वारका ते दत्तमंदिर 10 पदरी रस्ता 12 महिन्यांत अशक्य? 177 कोटींच्या टेंडरप्रकरणी कंत्राटदारांचे काय आहेत आक्षेप?

मुंबई आणि लगतच्या महानगर क्षेत्रात पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यंदा पाऊस काहीसा लांबणीवर पडल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांना पूर्वतयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे चोख नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई व परिसरातील पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुंबईच्या महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, नौदल आणि एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde
Mumbai Infrastructure: 2027 पर्यंत मुंबईतील 93 टक्के रस्ते सिमेंटचे होणार; कोणी केला दावा?

नालेसफाई आणि सुरक्षा ऑडीट तातडीने पूर्ण करा
बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, ज्या भागात अजूनही नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण केली जावीत. त्याचप्रमाणे पूर नियंत्रण दरवाजे आणि पाणी साठवून ठेवणारे तलाव पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावेत. मुंबईतील धोकादायक दरडप्रवण क्षेत्रात तात्काळ लोखंडी संरक्षण जाळ्या बसवण्याचे तसेच शहरातील सर्व अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही त्यांनी दिले. एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने स्वतःचे 'आपत्ती प्रतिसाद दल' तयार करावे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पातळीवर त्वरित मदत पोहोचवणे सोपे होईल.

खड्डे दुरुस्तीचा ८० टक्के खर्च वाचला
मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शहरातील एकूण २,००० किमी लांबीच्या रस्त्यांपैकी १,७०० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे यंदा रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती आणि देखभालीसाठी होणाऱ्या महापालिकेच्या खर्चात तब्बल ८० टक्क्यांची प्रचंड घट झाली आहे. उरलेल्या रस्त्यांचे कामही वेगाने पूर्ण केले जाईल.

Eknath Shinde
Mumbai Water Metro: ट्राफिकची कटकट संपणार! मुंबईत धावणार हायटेक 'वॉटर मेट्रो'; 31 जलमार्ग 45 टर्मिनल्सचा मेगा प्लॅन

पंप नियंत्रणासाठी 'स्मार्ट मॅनेजमेंट सिस्टीम'
यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचे (हाय टाईड) तब्बल २४ दिवस असणार आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरात पाणी साचू नये म्हणून मुंबईत ९३४ ठिकाणी पाणी उपसणारे शक्तिशाली पंप बसवण्यात आले आहेत, तर ६५ मिनी पंपिंग स्टेशन्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, या सर्व पंपिंग स्टेशन्सच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा प्रथमच 'स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली' कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातून या प्रणालीद्वारे थेट देखरेख ठेवली जाणार आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी शहरात १००० आपदा मित्र, एनडीआरएफची ३ पथके आणि नौदलाची ९ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे ट्रॅकखालील नाल्यांची योग्य साफसफाई करून रेल्वे सेवा आणि मेट्रो स्थानकांवर पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेशही रेल्वे व मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Eknath Shinde
Virar Alibaug Multimodal Corridor: 66 हजार कोटींच्या विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी लवकरच टेंडर; भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Key Points Summary

  • पावसाळ्यात मुंबईत 'शून्य जीवितहानी'चे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश.

  • मुंबईतील २,००० किमीपैकी १,७०० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण; खड्डे दुरुस्तीचा ८०% खर्च वाचला.

  • मुंबई मनपाला एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतःचे विशेष आपत्ती प्रतिसाद दल उभारण्याच्या सूचना.

  • जून ते सप्टेंबर दरम्यान २४ दिवस साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीचे हाय टाईड असणार.

  • पाणी उपसण्यासाठी मुंबईत ९३४ शक्तिशाली पंप आणि ६५ मिनी पंपिंग स्टेशन्स सज्ज.

  • पंपांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी यंदा 'स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली' कार्यरत.

  • आपत्कालीन परिस्थितीसाठी १००० आपदा मित्र, एनडीआरएफची ३ आणि नौदलाची ९ पथके तैनात.

Tendernama
www.tendernama.com