
मुंबई (Mumbai): घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ आज फुटणार आहे.
१०९९ कोटी रुपयांचे सर्वात कमी किंमतीचे हे टेंडर ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन’ कंपनीला मिळणार हे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात ४,०५३ झोपडपट्टीधारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) संयुक्त भागीदारीत रमाबाई आंबेडकरनगर येथील ३१.८३ हेक्टर जागेचा पुनर्विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पातील ६.९५ हेक्टर क्षेत्रफळाचा विकास केला जाणार आहे.
प्रकल्पाच्या कामासाठी यापूर्वीच वास्तुविशारदाची नेमणूक एमएमआरडीएने केली आहे. आता झोपडपट्टीधारकांसाठी इमारती उभारणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 'पॅकेज ए'मधील इमारतींचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे.
चार कंपन्यांनी टेंडर भरले आहे. ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन’ कंपनीने १०९९ कोटी रुपयांचे सर्वात कमी किंमतीचे टेंडर भरले. तर ‘एनसीसी लिमिटेड’ या कंपनीने १२९८ कोटी रुपयांचे टेंडर भरले आहे. त्यामुळे ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन’ कंपनीला हे टेंडर मंजूर होणार हे स्पष्ट झाले आहे. त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.
त्यामुळे एमएमआरडीएने या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील दोन पुनर्वसन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन केले आहे. हे भूमिपूजन आज, १४ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. एमएमआरडीएने त्याची जोरदार तयारी केली आहे.
एमएमआरडीएने रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर येथील १६,६७५ झोपडपट्टीधारकांना पात्र ठरविले आहे. यातील पहिल्या टप्प्यात सुमारे ४५०० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण केले जाईल.
प्रकल्पाचे काम चार क्लस्टरमध्ये केले जाणार आहे. पहिल्या क्लस्टरमध्ये ४०५३ झोपड्या असून, या भागाचा पुनर्विकास प्रथम केला जाणार आहे. झोपडडीधारकांसाठी ४०५३ घरे उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या क्लस्टरमध्ये ८,५३९ झोपड्या, तिसऱ्या क्लस्टरमध्ये ९८१ झोपड्या व चौथ्या क्लस्टरमध्ये ६८५ झोपड्या आहेत. प्रभातनगर १६९ व सार्वजनिक प्रयोजन २७ झोपड्यांचा समावेश आहे.