

मुंबई (Mumbai): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीसाठी शासकीय वाहनांचा ताफा कमी करण्याचे निर्देश दिले असतानाच, 'महानिर्मिती' कंपनीने मात्र ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध असतानाही पोफळी येथे प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला हरताळ फासत, लाखो रुपयांचे इंधन जाळून ही बैठक होणार असल्याने संताप व्यक्त होत आहे.
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश
जागतिक ऊर्जा संकट आणि परकीय चलन बचतीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेपुरता करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रवासाऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे बैठका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
महानिर्मितीचा दौरा वादात
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाची 'महानिर्मिती' कंपनी मात्र या नियमांना केराची टोपली दाखवताना दिसत आहे. महानिर्मितीची मासिक पुनरावलोकन बैठक साधारणपणे ऑनलाइन किंवा मुंबई मुख्यालयात होते. मात्र, सध्याचा आंब्याचा मोसम लक्षात घेऊन मे महिन्याची ही महत्त्वाची बैठक चक्क पोफळी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुंबईसह चंद्रपूर, नागपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी आणि नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी आपापल्या कुटुंबासह येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लाखो रुपयांच्या इंधनाचा अपव्यय
महानिर्मितीच्या सर्व केंद्रांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी अद्ययावत आणि कोट्यवधी रुपये खर्च केलेली यंत्रणा उपलब्ध आहे. असे असतानाही, केवळ सहलीच्या उद्देशाने शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पोफळीत एकत्र येण्याचा घाट घातला गेला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी कंपनीच्या गाड्या आणि विमानांचा वापर होणार असून, यात हजारो लिटर इंधन आणि लाखो रुपयांचा सार्वजनिक पैसा खर्च होणार आहे.
सरकारी कंपनीच जर अशा प्रकारे उधळपट्टी आणि इंधनाचा अपव्यय करत असेल, तर सर्वसामान्यांकडून प्रतिसादाची अपेक्षा कशी ठेवायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोदींच्या आवाहनालाच हरताळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ताफा कमी करण्याचे आदेश महानिर्मितीने धाब्यावर बसवले.
ऑनलाइन बैठकीची सोय असतानाही पोफळी येथे प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन.
चंद्रपूर, नागपूर, नाशिकसह विविध केंद्रांवरील अधिकारी कुटुंबासह सहलीसाठी येणार.
सरकारी वाहने आणि विमानांच्या वापरामुळे लाखो रुपयांचा इंधन खर्च होणार.
कोकणातील आंब्याचा मोसम साधण्यासाठी बैठकीचे ठिकाण बदलल्याची चर्चा.