
लातूर (Latur) : जल जीवन कार्यक्रमांतर्गत (Jal Jeevan Mission) अजून काम सुरू न केलेल्या व अतिशय संथ गतीने काम करणाऱ्यात सात कंत्राटदारांविरुद्ध (Contractors) कारवाई करण्यात येत आहे.
या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, कंत्राटदारांकडील सर्व कामांच्या फेरटेंडर (Retender) करून कामे सुरू करण्यात आली आहेत. अपेक्षित गतीने काम न करणाऱ्या ४६९ कंत्राटादरांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या १११ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
शंभर दिवसांत तडीस नेण्यात येणाऱ्या या सर्व योजनांचे सध्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून, शंभर दिवसांत राहिलेल्या या कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शेलार यांनी दिली.
जल जीवन मिशनमधून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात योजनेतून आतापर्यंत ३२५ योजना पूर्ण झाल्या असून, त्यातून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील तीन लाख ७४ हजार ५८२ कुटुंबांपैकी मिशन सुरू होण्यापूर्वी एक लाख ६६ हजार ९०० नळजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मिशनमधून एक लाख ९४ हजार २०६ कुटुंबांना नळजोडण्या दिलेल्या आहेत. सध्या तीन लाख ६१ हजार १०६ इतक्या म्हणजेच ९६.४० टक्के जोडण्या दिल्या आहेत. अद्याप १३ हजार ४७६ कुटुंबांना नळजोडण्या देणे शिल्लक आहे.
योजनेत कामांचा दर्जा व गुणात्मकता राखून कामे पूर्ण करण्यात येत आहेत. योजनेच्या कामात अनेक दानशूर व्यक्तींनी जलकुंभ उभारणीसाठी जमीन दान केली आहे. तीस योजनांसाठी जागेचा शोध सुरू असून, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज शेलार यांनी व्यक्त केली.
शंभर दिवसांत १११ योजना पूर्ण करण्यासोबतच ७३ गावांची कार्यात्मक नळजोडणी पूर्ण करणे, तर कार्यात्मक नळजोडणी पूर्ण झालेल्या गावांची संख्या ८७२ वर नेण्यात येणार आहे. यासोबत उद्भव व माहितीफलकांचे जिओ टॅगिंगचे काम आठ दिवसांत शंभर टक्के पूर्ण करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.