
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सामाजिक न्याय विभागाची राज्यभरातील वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवा बिछाना मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने १६ कोटी ६७ लाख रुपयांच्या खर्चास शुक्रवारी (ता. १४) प्रशासकीय मान्यता दिली. याद्वारे नरम गाद्या, नव्या उशा, अभ्रे आणि मच्छरदाणीसह विद्यार्थ्यांना आरामदायी झोपेची व्यवस्था केली जाणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी किलेअर्क येथील वसतिगृहाला भेट दिली होती. तेथील बिछाना, गाद्या, पलंग यांची दुरवस्था पाहून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पुण्यात डिसेंबर महिन्यात समाजकल्याण विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना थेट दिल्या जाणाऱ्या सुविधांतील अडसर दूर करण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारी राज्यभरातील वसतिगृहे आणि निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी २३ हजार ४०७ गाद्या, ३२ हजार ६५ उशा, ५९ हजार ९०५ अभ्रे आणि ५० हजार ३७ मच्छरदाण्या खरेदी करण्यासाठी मागणी नोंदविली आहे. या नवे साहित्य महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ (महाटेक्स) तसेच नागपूरचे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांच्याकडून खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने १६ कोटी ६७ लाख ५९ हजार ७२७ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
दूध पुरवठ्यासाठी टेंडर
सामाजिक न्याय विभागाची मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्यात ४४३ शासकीय वसतिगृहे आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ९३ शासकीय निवासी शाळा आहेत. या वसतिगृहांमध्ये ४३ हजार विद्यार्थी प्रवेशित असून, निवासी शाळांमध्ये १४ हजार ६०० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दररोज चांगल्या प्रतीचे दूध मिळण्यात अडचणी येत असल्याने दूध पुरवठ्यासाठी नव्याने टेंडर करण्याचा निर्णयही काल सरकारने घेतला आहे.
सुखाच्या निद्रेसाठी...
२३,४०७
गाद्या
३२,०६५
उशा
५९.९०५
अभ्रे
५०,०३७
मच्छरदाण्या