छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जुन्या शहरातील सिटी चौक, टिळक पथ, बुढीलेन, जुनाबाजार, पैठण गेट रस्त्यांप्रमाणेच नवीन संभाजीनगरातील महापालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाईतील रस्त्यांची स्थिती झालेली आहे. या भागातील देवळाई रस्ता, रेणुकामाता मंदिर ते अहिल्याबाई होळकर चौक, कमलनयन बजाज हाॅस्पीटल ते सुधाकरनगर, बीडबायपास गोदावरी ढाबा ते आमदार रोड ते हायकोर्ट काॅलनी हे अरूंद रस्ते नावालाच उरले आहेत.
सातारा-देवळाईकरांनी कामानिमित्त कोणत्याही वेळी वाहन रस्त्यावर काढल्यानंतर या संपूर्ण रस्त्यांवर वाहतूक कोंडीचीच भीती प्रत्येकाला सतावत आहे. विशेषतः महिला व मुलींना वाहने घेऊन घराबाहेर पडणे नकोसे वाटते. ही परिस्थिती असतानाच सातारा-देवळाईची गुलमंडी समजल्या जाणाऱ्या मुख्य बाजारपेठ असलेल्या रेणूकामाता मंदीर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक व आमदार रोड रस्त्यांची तर बिकट अवस्था बनलेली आहे. ना जनाची ना मनाची लाज न बाळगता काही वाहनधारक रस्त्यातच वाहने लाऊन निष्पाप वाहनधारकांची कोंडी करत असल्याचे "टेंडरनामा"च्या पाहणीत समोर आले आहे. या भागातील नागरिकांच्या विशेषतः महिला व मुलींच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रतिनिधीने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत रेणूकामाता मंदीर कमानीजवळ उभे राहून बेशिस्त वाहनचालकांचे वाहनतळ कॅमेऱ्यात टिपले. याशिवाय दुचाकीस्वार तरूणांसह गौणखनिजाची वाहतुक करणाऱ्या हायवा आणि इतर मालवाहू वाहने या रस्त्यांवरून सुसाट घेऊन जात असल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीत आढळले.
सातारा-देवळाईतील या छोट्या व अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे सातारा-देवळाईचा झालर क्षेत्रात समावेश झाल्यानंतर सिडकोच्या विकास आराखड्यात हे सर्व रस्ते शंभर फुटांचे टाकण्यात आले होते. मात्र सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर झालर क्षेत्रातून ही दोन्ही गावे रद्द करण्यात आल्याने शंभरफुटी रस्ते कागदावरच राहीले. महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात सिडकोच्या आराखड्याचा विचार केला असला तरी त्यामुळे सातारा-देवळाई ग्रामपंचायतीच्या काळातील ६८ वर्षांपूर्वीचे या भागातील रस्ते वाहतुकीसाठी 'मोठे' करताना महापालिकेला मोठ्या प्रमाणावर पाडापाडी करावी लागणार आहे. यासाठी भुसंपादनासाठी किमान दोन हजार कोटी रूपये लागतील इतका निधी कोठून आणतील. त्यामुळे कोंडी फुटेल अशी सुतराम शक्यता नाही.
‘टेंडरनामा’च्या प्रतिनिधीने या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर कोठेही 'रस्त्यांचा' श्वास मोकळा झालेला हा प्रकार दिसून आला नाही. सगळीकडे दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा सुरू असते. बाजारपेठ, रूग्णालये, बॅंका, सरकारी कार्यालये समोरूनही जड वाहनचालक कोणतीही भीडभाड न पाळता 'सुसाट'त वाहन घेऊन जातात. त्याकडे संबंधित पोलिसही दुर्लक्ष करतात. त्यामुळे या छोट्या रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात रस्त्यालगत दुकानदारांनी रस्त्यापर्यंत पथारी पसरल्याने आधीच अरूंद रस्ते अधिक अरूंद झाली आहेत. समोर दुकानदारांचे अतिक्रमण आणि रस्त्यांवरच बेशिस्त वाहनतळांनी रस्तेच गिळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक तसेच देवळाई रस्ता सोलापूर-धुळे महामार्गाला जोडत असल्याने साईटेकडीकडे पर्यटन व दर्शनासाठी या मार्गांवरून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची गर्दी असते. यामुळे या मार्गांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावणे व बेकायदा वाहनतळ उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे.