Sambhajinagar : 36 कोटींतून उजळणार 'या' मुख्य रस्त्याचे भाग्य
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : देवळाई-भिंदोन-गाडीवाट-घारदोन-कचनेर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-३५ अंतर्गत पश्चिम मतदार संघाच्या हद्दीपर्यंत दहा किलोमीटर दुरूस्तीसाठी पीडब्लुडीने ३६ कोटीचे टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यात जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर, जे. पी. कन्स्ट्रक्शन, व्ही. पी. सेठ्ठी, पी. एस. बागडे आदी चार कंपन्यांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. यापैकी जीएनआय इनफ्रास्ट्रक्चरला याकामाची लाॅटरी लागली असून, पुढील आठवड्यात या सिमेंट रस्त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीशी बोलताना दिली.
बीड बायपास देवळाई चौक ते देवळाई गाव, देवळाई गाव ते धुळे-सोलापुर हायवे आणि धुळे-सोलापुर हायवे ते साईटेकडी पर्यंत अशा तीन टप्प्यात या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडलेल्या या रस्त्याचे येत्या महिन्याभरात भाग्य उजळणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वसाहती, मुख्य बाजारपेठ, शाळा महाविद्यालये सरकारी-निमसरकारी कार्यालये आहेत. या भागात नवनवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे. देवळाई चौक ते साई टेकडी या संपुर्ण चाळणी झालेल्या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असत.
याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, कृषी विद्यापीठ आणि साई टेकडीचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना देखील माेठा त्रास सहन करावा लागत असे. या रस्त्याच्या दुरावस्थेवर 'टेंडरनामा'ने सातत्याने आवाज उठवल्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात १० किमी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी साडेसहा कोटी मंजूर केले होते. परंतु, रस्त्याच्या दोन्ही बाजुला स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा नसल्याने पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची चाळणी होत असे. त्यामुळे डांबरीकरणाचा प्रस्ताव रद्द करून शिंदे सरकारच्या काळात पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्ट्राम वाॅटर यंत्रणा रूंदीकरण आणि आवश्यक तेथे पूलमोऱ्या, बाॅक्स कन्व्हर्ट इत्यादीचा समावेश करत हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा करण्यासाठी बांधकाम विभागामार्फत राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ३६ कोटींची मंजूरी दिली. त्यामुळे देवळाई रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त हाेत आहे.
नव्यानेच तयार झालेल्या बीड बायपास राष्ट्रीय महामार्ग -२११ येथील देवळाई चौकापासून ते धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणार हा प्रमुख रस्ता आता चकाचक होणार आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या छाेट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांना आता दिलासा मिळणार आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका देखील थांबणार आहे. तसेच रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार असल्याने सततच्या वाहतूक काेंडीतून नागरिकांची सूटका होणार आहे. विशेष म्हणजे शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी याच मार्गावरील साई टेकडीसह निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या या रस्त्यामुळे आता अधिक वाढणार आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने पर्यटकांनाही माेठा त्रास सहन करावा लागत असे. आता पर्यटकांची देखील खड्ड्यातून सूटका होणार असल्याने या भागातील पर्यटनवाढीला देखील आता वाव मिळणार आहे. याशिवाय हा रस्ता कचनेर येथील जैन मंदिराकडे जातो. त्यामुळे तेथे जाणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळणार आहे. पाऊस पडल्यानंतर या रस्त्यातील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप येते. आता सिमेंटीकरणामुळे डबकेमुक्त रस्ता होणार आहे.
या पर्यटनस्थळांना दिलासा
या प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४० पेक्षा अधिक सोसायट्या आहेत. या रस्त्यावर रॉयल ऑक्स इंग्लिश स्कूलसह छोट्या-मोठ्या १५ पेक्षा अधिक शाळा, एमजीएम कृषी विद्यापीठ, साई टेकडी, साई मंदिर, कचनेर जैन मंदिर आहे. तसेच, सोलापूर हायवेसुद्धा या रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे बीड बायपासकडून सोलापूर हायवेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या माेठी आहे.त्यामुळे अनेकांना या होत असलेल्या नव्या रस्त्याचा दिलासा मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गासारखीच ट्रीटमेंट या रस्त्याला मिळणार असल्याने याभागातील गृहप्रकल्प आणि प्लाॅटींग व्यवसाय करणार्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.