Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

'एसटी' महामंडळाचा धाडसी निर्णय; ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बस लवकरच

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : एसटीच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी असून या एसटीच्या चालक-वाहकांचे गावकऱ्यांशी कायमचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असून काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात ५१५० संपूर्णपणे वातानुकूलित ई-बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

एसटी महामंडळाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती करण्यात येत आहे. या ३४ आसनी, वातानुकूलित ई-बसेस बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या शिवशाही बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. ठाणे शहरातील खोपट बसस्थानकात आयोजित कार्यक्रमास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटिया, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. “गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी” या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी एसटीची बस सेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महानगरपालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एस.टी. प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना, 65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.

एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली आहे असे मानून तिचा सांभाळ करायला हवा, असे आवाहन करुन शिंदे यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत, असे निर्देश दिले. ते म्हणाले की, एस.टी आगार स्वच्छ असले पाहिजे, तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एस.टी. आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे, इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे. नवनवीन कल्पना अंमलात आणून एस.टी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावे. डीप क्लीन ड्राईव्ह च्या माध्यमातून सर्वत्र उत्तम प्रकारे स्वच्छता होत आहे. शहरी व ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत. एस.टी आगारांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित कराव्यात. तेथील स्वच्छतागृह उत्तम दर्जाचे असावेत. एस.टी.चालक-वाहक यांची विश्रांतीगृहे चांगली असावीत. एस.टी. कॅन्टीन चांगले असावे. तिथल्या अन्नाचा दर्जा उत्तम असावा. गाड्या स्वच्छ असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा मिळायला हवी. गेल्या आठ महिन्यांपासून आपण “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक” अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे.

शिंदे म्हणाले की, राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. “हात दाखवा एसटी थांबवा” या उपक्रमामुळे लोकांमध्ये आणि एस.टीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एस.टी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एस.टी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एस.टी. ला नफ्यात आणूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पराग जैन यांनी केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक  सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या.

अशा आहेत एसी ई-बसेस :

३४ आसनी मिडी बस

संपूर्ण वातानुकूलित

एका चार्जिंगमध्ये २०० किमी प्रवास

केवळ २ तासांत पूर्ण चार्जिंग

तिकीट दर ( रुपये)

बोरिवली-नाशिक ४०५

ठाणे-नाशिक ३४०