मुंबई (Mumbai): देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्र आजही अग्रस्थानी असून, कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, ऊर्जा, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भक्कम कामगिरी केली आहे. पायाभूत सुविधांच्या बळावर महाराष्ट्र ‘महा-राष्ट्र’ म्हणून महासत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केला.
नागपूर येथे नियम २९३ अंतर्गत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा सविस्तर आढावा मांडला. कोविड काळातील आव्हाने मागे टाकून आता महाराष्ट्र निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे सांगत अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक राजकारणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई महाराष्ट्राचीच होती, आहे आणि कायम राहील, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर संविधानाच्या चौकटीत महाराष्ट्र पुढे जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश झाल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
राज्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार २०३०, २०३५ आणि २०४७ असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले असून २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, या दिशेने काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्थूल राज्य उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज उभारण्याची परवानगी असताना केवळ १८.८७ टक्के कर्ज घेतले आहे. राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत राखण्यात आली असून कॅगच्या सर्व आर्थिक अटी राज्याने पूर्ण केल्या आहेत.
गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असून दावोस येथे झालेल्या १७.५७ लाख कोटी रुपयांच्या करारांपैकी ७५ टक्के करारांची अंमलबजावणी सुरू आहे. २०२४-२५ मध्ये राज्यात १.६४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आली असून देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.
विदर्भात संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील आणि कोल गॅसिफिकेशन क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत असून मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत आहे. गडचिरोली हा नव्या गुंतवणुकीचा केंद्रबिंदू ठरत असून नागपूरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर ‘नवीन नागपूर’ उभारले जाणार आहे, जिथे पाच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
ऊर्जा क्षेत्रात राज्याने मोठी झेप घेतली असून १६,००० मेगावॅटचा सौर प्रकल्प, पीएम कुसुम योजनेतील विक्रमी सौर पंप आणि पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांवर आधारित असेल. सिंचन क्षेत्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेष जवळपास संपुष्टात आला असून गोसीखुर्द आणि वैनगंगा–नळगंगा यांसारखे प्रकल्प निर्णायक ठरणार आहेत.
द्रुतगती महामार्ग, मेट्रो, सागरी मार्ग, भुयारी रस्ते आणि शहरी पुनर्विकास प्रकल्पांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी वेगाने वाढत आहे. उत्तराचा समारोप करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आता थांबणार नाही; सर्वांच्या सहकार्याने राज्याला विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर नेण्याचा निर्धार सरकारचा आहे.
ऊर्जा क्षेत्रात राज्याने मोठी झेप घेतली असून १६,००० मेगावॅटचा सौर प्रकल्प, पीएम कुसुम योजनेतील विक्रमी सौर पंप आणि पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांवर आधारित असेल. सिंचन क्षेत्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेष जवळपास संपुष्टात आला असून गोसीखुर्द आणि वैनगंगा–नळगंगा यांसारखे प्रकल्प निर्णायक ठरणार आहेत.
द्रुतगती महामार्ग, मेट्रो, सागरी मार्ग, भुयारी रस्ते आणि शहरी पुनर्विकास प्रकल्पांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी वेगाने वाढत आहे. उत्तराचा समारोप करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आता थांबणार नाही; सर्वांच्या सहकार्याने राज्याला विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर नेण्याचा निर्धार सरकारचा आहे.