नाशिक (Nashik): महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या समृद्धी महामार्गाला नाशिक शहर थेट जोडण्यासाठी पांढूर्ली कनेक्टर करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता मान्यता दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून त्यामुळे समृद्धी महामार्ग नाशिकपासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर येईल, असेही सांगितले जात आहे. मुळात वाढवण बंदराला जोडण्यासाठी प्रस्तावित केलेल्या तवा - भरवीर हा महामार्ग नाशिकच्या रिंगरोडला जोडला जाणार असून त्या मार्गाने समृद्धी महामार्गावर जाणे सहज शक्य असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी रुपयांच्या पांढूर्ली इंटरचेंजचा हट्ट का, असा प्रश्न विचारला जात आहे.
नाशिक शहराला समृद्धी महामार्गाशी थेट जोडणारा हा प्रकल्प पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. त्यामुळे हे काम अत्यंत वेगाने केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पांढुर्ली कनेक्टर नाशिकपासून अंदाजे २८ किलोमीटर अंतरावर असेल. सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, त्यासाठी फारच थोडे भूसंपादन करावे लागणार आहे.
सुरुवातीला सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीचा मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने दोनपदरी रस्ता तयार केला जाईल. त्यानंतर योग्य वेळी जमीन संपादित करून रस्त्याची रुंदी चारपदरी करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक शहर ते पांढुर्ली दरम्यानचा रस्ताही विकसित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे.
नाशिकहुन समृद्धीला जोडण्यासाठी सध्या गोंदे (ता. सिन्नर), भरवीर व इगतपुरी हे तीन कनेक्टर आहेत. सध्या नाशिकहून मुंबईला जाणारी वाहने नांदगाव सदो येथील कनेक्टरचा वापर करतात, तर नागपूरच्या दिशेने जाणारी वाहने गोंदे येथील कनेक्टरचा वापर करीत आहेत. त्यात इगतपुरी कनेक्टरचा वापर करणा-या वाहन धारकांना घोटी टोलनाक्यावर एक-दोन किलोमीटरसाठी टोल भरावा लागतो. भरवीरला जाण्यासाठी एकेरी मार्ग असल्याने त्याचा वापर होत नाही, यामुळे पांढूर्ली येथील प्रस्तावित कनेक्टर हा नाशिकपासून केवळ २८ किलोमीटर असल्याने नाशिकच्या वाहनधारकांची घोटी टोलनाक्यातून सुटका होईल, असे कारण दिले जात आहे.
नाशिक शहरापासून भरवीर कनेक्टर ४४ किलोमीटर, तर इगतपुरी कनेक्टर ५० किलोमीटर असून त्या तुलनेत पांढूर्ली कनेक्टर २८ किलोमीटर असल्याने तो नाशिककरांच्या सोईचा असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात आहे.
टोल वाढणार की कमी होणार?
पांढूर्ली कनेक्टरसाठी दिल्या जाणा-या कारणांमधून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पांढूर्ली कनेक्टर व भरवीर कनेक्टर यांच्यातील अंतर दहा किलोमीटरपेक्षाही कमी आहे. यामुळे या ३०० कोटी रुपयांच्या कनेक्टरमुळे नाशिककरांचा समृद्धीला जोडण्याचे अंतर केवळ दहा किलोमीटरने वाचणार असून तेवढ्या दहा किलोमीटर अंतराचा वाढीव टोल द्यावा लागणार आहे. सध्या इगतपुरी कनेक्टरला जाण्यासाठी घोटी येथे टोल भरणा-या वाहनांना प्रस्तावित पांढूर्ली कनेक्टर ते इगतपुरी कनेक्टर या दरम्यान टोल भरावाच लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्गापेक्षा समृद्धी महामार्गावरील टोलचे दर अधिक असल्याने पांढूर्ली कनेक्टरमुळे टोल वाढणार की कमी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कनेक्टरमुळे समृद्धी महामार्ग नाशिक शहराच्या सर्वाधिक जवळ येणार असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे असले, तरी इगतपुरी कनेक्टरच्या तुलनेत तो व्यवहार्य ठरण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
रिंगरोडनंतर प्रश्न सुटणार
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सध्या नाशिक शहरासाठी रिंगरोड मंजूर असून भूसंपादन अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी कामही सुरू झाले आहे. हा रिंगरोड व्हीएफसी फाट्याजवळ प्रस्तावित तवा-भरवीर (वाढवण बंदराला जोडण्यासाठी) या महामार्गाला जोडला जाणार आहे. म्हणजे रिंगरोड व तवा- भरवीर या महामार्गाचे काम झाल्यानंतर नाशिकची वाहने भरवीर कनेक्टरला थेट जोडली जाणार आहेत. यामुळे पांढूर्ली कनेक्टरची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच पांढूर्ली कनेक्टरला जोडला जाणारा रस्ता हा पहिल्या टप्प्यात देवळाली कॅम्प ते पांढूर्लीपर्यंत एकेरीच राहणार आहे. त्यातच सिंहस्थापर्यंत या कनेक्टरचे काम होणार का, याप्रश्नाबरोबरच रिगंरोड व तवा- भरवीर महामार्गाच्या कामानंतर त्याची व्यवहार्यता उरणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.