Nashik Palghar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशिक-पालघर प्रवास आता सुसाट!

सिंहस्थातील घोटी-त्र्यंबकेश्वर चौपदरी महामार्गाला केंद्राकडून पालघरपर्यंत मंजुरी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थविकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या घोटी-त्र्यंबकेश्वर-आंबोली या मार्गाच्या चौपदरी करणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक कार्य समितीने मान्यता दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० ए वरील घोटी-त्र्यंबकेश्वर मोखाडा-जव्हार- मानोर-पालघर या सुमारे १५५ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरण कामाला मंजुरी दिली असून या प्रकल्पासाठी ३ हजार ३२० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या महामार्गामुळे समृद्धी महामार्गावरून थेट प्रस्तावित वाढवण बंदरापर्यंत जाता येणार आहे. नाशिक ते पालघर दरम्यानचा प्रवासही या मार्गामुळे अधिक वेगवान होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखड्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०ए वरील घोटी-त्र्यंबकेश्वर-आंबोली या मार्गास मान्यता देण्यात आली होती. समृद्धी महामार्ग व मुंबईमार्गे येणाऱ्या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान नाशिक शहरात सातपूर व अंबड या मोठ्या औद्योगिक वसाहती असून, येथे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा राबता असतो. परिणामी शहरावरील वाहतुकीचा ताण वाढतो. सध्या ही वाहतूक एनएच-८४८ मार्गे शहरातून जात असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते.

पालघर येथील प्रस्तावित वाढवण बंदर २०२९ पासून सुरू होणार आहे. यामुळे मुंबई आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरून वाढवणकडे जाणारी वाहतूक नाशिक शहरातून नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गाने गेल्यास वाहतूक कोंडीची समस्या गंभीर वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे.

यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० ए हा घोटी ते पालघर असा चौपदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन प्रकल्पामुळे  मालवाहू वाहनांना त्र्यंबकेश्वर मार्गे ये-जा करण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध होऊन नाशिक शहरातील वाहतुकीचा ओघ कमी होण्यास मदत होणार आहे.

या प्रस्तावित महामार्गामुळे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी इंटरचेंजवरून वाहने पुढे एनएच-१६० ए चा वापर करून त्र्यंबक व नाशिककडे जलद गतीने पोहोचू शकणार आहे. या मार्गावर २०२८ पर्यंत प्रतिदिन १० हजार वाहनांची ये-जा होण्याचा अंदाज असून, यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण योग्य ठरणार आहे.

हा महामार्ग त्र्यंबकपासून पश्चिमेकडे मनोर-पालघरपर्यंतचा भाग दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे व  पश्चिम किनारपट्टीशी जोडतो. यामुळे महाराष्ट्रातील ६ आर्थिक नोड्स, १ सामाजिक नोड आणि ८ लॉजिस्टिक्स नोड्सशी जोडणी होईल. देशाच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सवर सकारात्मक परिणाम होईल.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवास वेळेत मोठी घट, वाहन ऑपरेटिंग खर्च कमी होईल आणि वाहतूक सुरळीत-सुरक्षित होईल. आदिवासी भागात मूलभूत सुविधा सुधारून आर्थिक विकासाला चालना मिळेल. प्रकल्पामुळे १९.९८ लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष आणि २४.८६ लाख मनुष्य-दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.

भूसंपादन सुरू

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सध्या या चौपदरी मार्गासाठी भूसंपादन सुरू असून या मार्गाचे काम मार्च २०२७पूर्वी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मार्गासाठी आता केंद्र सरकारने निधी मंजूर केल्याने या कामास आणखी वेग येणार आहे.