Nashik ZP
Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 1380 ग्रामपंचायतींसाठी Good News! तब्बल 61 कोटींचा...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील १३८० ग्रामपंचायतींसाठी जिल्हा परिषदेला (Nashik ZP) पंधराव्या वित्त आयोगाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अबंधितचा ६१.५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या वर्षाचा बंधित निधीचा हा दुसरा हप्ता आहे.

या आर्थिक वर्षात बंधितसाठी दोन हप्त्यांत १२३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, मागील डिसेंबरमध्ये अबंधितचे ४० कोटीं रुपये प्राप्त झाले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना या आर्थिक वर्षात १५ व्या वित्त आयोगाचे १६३ कोटी रुपये निधी मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा निधी जवळपास दुप्पट आहे. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त अयोगातून केवळ ८९ कोटी रुपये निधी मिळाला होता.

केंद्र सरकार वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थांना पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा यासाठी निधी दिला जातो. सध्या २०२०-२१ या वर्षापासून पंधरावा वित्त आयोगातून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देताना जिल्ह्याच्या एकूण निधीपैकी ग्रामपंचायतींना ८० टक्के व पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना प्रत्येक दहा टक्के निधी दिला जातो.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मागील वर्षाचा किमान ५० टक्के निधी खर्च केला, तरच पुढील वर्षाचा निधी दिला जातो. अन्यथा त्या निधीमध्ये कपात होते. जिल्ह्याला पंधराव्या वित्त आयोगातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३२८.१७ कोटी रुपये निधी देण्यात आला होता. हा निधी पहिल्या वर्षी खर्च न होऊ २०२१-२२ या वर्षात नाशिक जिल्ह्याला देय असलेल्या निधीत कपात होत २६४.१८ कोटी रुपये निधी दिला. मात्र, त्या वर्षीही निधी खर्च न झाल्याने २०२२-२३ या वर्षात जिल्ह्याला केवळ ८९.१२ कोटी रुपये निधी मिळाला होता. मात्र जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या पातळीवर निधी खर्च होण्याचे प्रमाण कमी आहे.

तसेच २०२२-२३ पासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राजवट असल्याने त्यांच्या वाट्याचा २० टक्के निधी दिला जात नाही. दररम्यान वेळेत निधी खर्च न करण्याबाबत ग्रामपंचायतींचे धोरण कायम राहिल्याने या आर्थिक वर्षात मागील नोव्हेंबरमध्ष ६१.३४ कोटी रुपये बंधित निधी प्राप्त झाल्यानंतर डिसेंबरमध्ये ४० कोटी रुपये अबंधित निधी वितरित करण्यात आला होता.

त्यानंतर १३ मार्च २०२४रोजी ग्रामविकास विभागाने बंधित निधीचा ६१ कोटी ५०लाख ४८हजार रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यात वर्ग केले आहेत. यामुळे या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा बंधित व अबंधित मिळून जवळपास १६३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आतापर्यंत पंधराव्या वित्त आयोगातून ६८३.५८ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून, जानेवारी पर्यंत त्यापैकी ५८ टक्के म्हणजे ३९९.२१ कोटी रुपये खर्च झाला आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च झाल्याने अबंधितचा ६१.५० कोटींचा दुसरा हप्ता प्राप्त झाला आहे.15th