
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कामे करण्यास मजूर, पुरवठादार, मशिनरी आणि वाहनांचा पुरवठा करणाऱ्या सबठेकेदारांनी नकार दिल्याची धक्कादायब बाब समोर आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून संबंधितांना कामाचा मोबदला मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटतो आहे.
पैठण तालुक्यातील लाखेगाव येथील एका टॅक्टर पुरवठाधारकाने गुरुवारी थेट जीव्हीपीआरच्या गोडाउनच्या प्रवेशदारातच ट्रॅक्टर आडवा लावल्याने तब्बल २४ जलकुंभांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये मजुरांना कामावर ने - आण करणे, बांधकाम साहित्याचा पुरवठा करणे आदी काम बंद केल्याने जलकुंभाची कामे थांबली आहेत.
नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकणे, जलकुंभांचे बांधकाम व अन्य कामे केली जात आहेत. यासाठी यूपी, बिहार, एमपी, झांसी व अन्य परप्रांतीय कामगार मागवलेले आहेत. स्थानिक पुरवठाधारकांकडून कामांसाठी आवश्यक मशिनरी व वाहने भाडे तत्वावर घेतलेली आहेत. त्यामध्ये हायवा, ट्रॅक्टर आदींचा समावेश आहे. या वाहनांमधून मजुरांची ने - आण , बांधकाम साहित्य, जलवाहिन्यांची वाहतूक केली जाते. परंतु चार - चार महिने कंपनीकडून भाडे मिळत नसल्याने आता पुरवठादारांनी यंत्रणा देण्यास नकार दिला आहे.
पैठण तालुक्यातील लाखेगाव येथील सत्यम राजपूत या ट्रॅक्टर पुरवठाधारकाने गुरुवारी सकाळी साडेआडच्या सुमारास सिडको एन - ५ टाउनसेंटर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानालगत असलेल्या खुल्या जागेवरील जीव्हीपीआरच्या गोडाऊनच्या प्रवेशदारातच ट्रॅक्टर आडवे लावून कंपनीचा बहिष्कार केला.
कंपनीने बांधकाम साहित्य व मजुरांची ने - आण करण्यासाठी त्याच्याकडून ३० हजार रुपये महिन्याने एक ट्रॅक्टर भाडे तत्वावर घेतले होते. परंतु गत चार महिन्यांपासून कंपनीने त्याचे एक लाख २० हजार भाडे थकवल्याने अखेर त्याने हा पवित्रा घेतला. आता जोवर कंपनीकडून भाडे वसूल होत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर तेथेच आडवे लावून तो निघून गेला.
संबंधित ट्रॅक्टर पुरवठाधारकाच्या अशा आगळ्यावेगळ्या बहिष्काराने कंपनीपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत तब्बल २४ जलकुंभांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये टिव्हीसेंटर, गरवारे, हिमायतबाग, दिल्लीगेट, लेबर काॅलनी, ज्युबलीपार्क, हर्सुल, शाक्यनगर, मिटमिटा, नक्षत्रवाडी, प्रतापगडनगर, सुधाकरनगर, देवळाई म्हाडा काॅलनी, आमेरनगर, सातारा तांडा श्रेयश काॅलेज, शहानुरमिया दर्गा, हरिओमनगर, चिकलठाणा, विठ्ठलनगर, ठाकरेनगर, पारिजात व कॅटली गार्डन, नारेगाव, ब्रिजवाडी, एसबीओए शाळा, हरसिध्दी काॅलनी आदींचा समावेश आहे.
प्रवेशदारातच आडवे ट्रॅक्टर लाऊन तो निघून गेल्याने कंपनीला बांधकामावर बांधकाम साहित्य व जेसीबीसह इतर वाहने आत बाहेर करता येत नसल्याने पाणी पुरवठा योजनेतील सारीच कामे ठप्प झाली आहेत.
जलकुंभाची व पाइपलाइनची कामे करणाऱ्या मजुरांना देखील चार - चार महिने मजुरी मिळणे बंद झाले आहे. केलेल्या कामाची मजुरी मिळत नसल्याने मजुरांनी काम करणे बंद करून गावाकडे निघून गेल्याचे काही मजुरांनी सांगितले. त्यामुळेही नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे कामे ठप्प झाली असून, आता इतर पुरवठाधारकांनीही यंत्रणा हलविण्याचा इरादा केला आहे.
नाथसागर कंपनीचे अर्जून कागदे यांनी योजनेसाठी १५ हायवा कंपनीला भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. त्यांचेही ९५ लाख थकविले आहेत. एका पुरवठाधारकाकडून हायड्रोक्लोरिक क्रेन भाडेतत्वावर घेतली आहे, त्यांचेही ५ महिन्यांपासून ५ लाख रुपये कंपनीने थकविले आहेत. जवळपास तीन कोटीपेक्षाही अधिक देणी कंपनीने थकविल्याने पुरवठादारांनी आता काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे एका विश्वसनीय सूत्राकडून समजते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांना जगविण्यासाठी पाणी देण्याऱ्या या कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे निर्माण झाले आहे.