
मुंबई (Mumbai Bengaluru Expressway): भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ७०० किमीचा पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्ग (Pune–Bengaluru Expressway) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर सुमारे ४२ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी भूसंपादनास सुरवात करण्यात येणार आहे.
या महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. यात पागोटे ते चौक हा ३० किमी आणि चौक ते पुणे वर्तुळाकार रस्ता हा १०० किमी असे दोन टप्पे असतील. हा महामार्ग अटल सेतू आणि जेएनपीटीला जोडला जाईल. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई आणि मुंबईतून दीड तासात पुण्याला पोहोचणे शक्य होईल. दरम्यान, पहिल्या ३० किमी महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार असून २९ गावातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी टेंडर काढले जाईल.
वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि तिसरी मुंबई यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होणार आहे. हे लक्षात घेता द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
मुंबई-पुणे-बंगळूरू या ८३० किमीच्या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाईल. अटल सेतू संपतो तेथून हा महामार्ग सुरू होईल व पुणे वर्तुळाकर रस्त्याला जोडून पुढे पुणे-बंगळूरू द्रुतगती महामार्गाला मिळेल. अटल सेतू-चौक-पुणे, शिवारे असा हा १३० किमीचा महामार्ग असेल.
महामार्गातील ३० किमीच्या आराखड्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १०० किमीच्या महामार्गाची व्यवहार्यता तपासणी अभ्यासासह आराखडा तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. महामार्ग वापरात आल्यानंतर मुंबई ते पुणे अंतर केवळ दीड तासात पार करता येईल, असा दावा करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे रस्ते प्रवासासाठी २००२ पासून ९४.५ किमीचा द्रुतगती महामार्ग सेवेत आहे. या सहा पदरी महामार्गामुळे मुंबई-पुणे अंतर अडीच तासात पार होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने द्रुतगती महामार्गाचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महामार्ग दहा पदरी करण्याचा निर्णय घेतला असून मिसिंग लिंकचे कामही सुरू आहे. असे असले तरी भविष्यात हा महामार्गही अपुरा पडण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घेत पुणे-बंगळूरु द्रुतगती महामार्गाचा विस्तार मुंबईपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत आणखी एक १३० किमीचा अटल सेतू-चौक-पुणे, शिवारे द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती एनएचएआयचे (पुणे) प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
पहिल्या ३० किमी महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार असून २९ गावातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी टेंडर काढले जाईल. दुसरीकडे १०० किमीच्या महामार्गाची व्यवहार्यता तपासणी आणि सविस्तर आराखड्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
पुणे-बंगळूरू द्रुतगती महामार्गासाठी जी कंपनी सल्लागार म्हणून आराखडा, व्यवहार्यता तपासणीचे काम करत आहे त्याच कंपनीकडून १०० किमीच्या महामार्गाच्या व्यवहार्यता तपासणी, आराखड्याची कामे होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात पुणे-बंगळूरू द्रुतगती महामार्गाच्या मुंबईपर्यंतच्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार पुणे ते मुंबईपर्यंतच्या महामार्गासाठी लवकरच व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे.