
मुंबई (Mumbai Ahmedabad Bullet Train): भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ३० जून २०२५ पर्यंत, या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी भावनगर टर्मिनस येथे अयोध्या एक्सप्रेस, रेवा-पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्सप्रेसला व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना वैष्णव यांनी बुलेट ट्रेनबाबत माहिती दिली.
"मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ही ट्रेन जेव्हा सुरू होईल, तेव्हा मुंबई ते अहमदाबादच्या प्रवासाला फक्त दोन तास सात मिनिटे लागतील," असे वैष्णव म्हणाले. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ५०८ किलोमीटरपर्यंत धावेल.
ही रेल्वे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधून आपला प्रवास सुरू करेल. गुजरातमधील वापी, सुरत, आणंद, वडोदरा आणि अहमदाबादला ट्रेनचा अंतिम स्टॉप असणार आहे. ताशी ३२० किमी वेगाने धावत ही ट्रेन मुंबई-अहमदाबादचा प्रवास ३ तासात पूर्ण करेल.
या दोन्ही शहरादरम्यान १२ स्टेशन असतील. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे १२ स्थानके बांधण्यात येतील. ३० जून २०२५ पर्यंत, या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी गुजरातमधील आगामी रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली, ज्यात पोरबंदर आणि राजकोट दरम्यान एक नवीन ट्रेन, राणावाव स्टेशनवर १३५ कोटी रुपयांची कोच देखभाल सुविधा, पोरबंदर शहरातील एक रेल्वे उड्डाणपूल, दोन गति शक्ती कार्गो टर्मिनल आणि भावनगरमधील नवीन बंदरात एक कंटेनर टर्मिनल यांचा समावेश आहे.