
हिंजवडी (Hinjawadi) : हिंजवडी येथील आयटी पार्क (Hinjawadi IT Park) देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (MNC's) या ठिकाणी कार्यरत असून, त्या कंपन्यांमध्ये हजारो अभियंते, कर्मचारी काम करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेला हा भाग मागिल काही काळापासून नकारात्मक बाबींमुळेच जास्त चर्चेत आहे.
हिंजवडी आयटी पार्कची अलिकडील काळात 'वॉटर पार्क' (Water Park) म्हणून ओळख निर्माण व्हायला लागली आहे. त्याचे कारण म्हणजे थोडा जरी पाऊस झाला तरी हिंजवडी आयटी पार्काकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचते आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. या वाहतूक कोंडीला आता सारेच वैतागले असले तरी प्रशासन मात्र किरकोळ उपाययोजना करून नामानिराळे होताना दिसते आहे. यंदाही पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाला नेहमीप्रमाणेच उशीरा जाग आलेली आहे.
आयटी पार्क हिंजवडी-माण परिसरात जोरदार पाऊस होताच रस्ते पाण्याखाली जाऊन सर्वांची दाणादाण उडते. त्यामुळे पावसाळी पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याचे ‘पीएमआरडीए’ने स्पष्ट केले.
हिंजवडी परिसरातील जुने नळ कोंडाळे तसेच ओढ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे ‘पीएमआरडीए’च्या कार्यकारी अभियंता रिनाज पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. पावसाळ्यात पाणी वाहून जाणारे प्रवाह पुनर्जीवित केले आहेत. पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा होण्यासाठी डॉलर कंपनी व अन्य गरजेच्या ठिकाणी भूमिगत वाहिन्या टाकून नवीन चेंबर बसविले आहेत.
माण फेज -२ येथील गवारे मळा परिसरातील पदपथ जेसीबीच्या साह्याने खोदले. तसेच डॉलर कंपनीसमोरील स्ट्रॉंग वॉटर लाईनमध्ये अडकलेला कचरा, घाण काढून स्वच्छ करण्यात आले. तुंबलेले ओढे-नाले व गटार व पावसाळी पाइपलाइन साफ करण्यात आल्या. मेट्रो पुलाखाली लावण्यात आलेल्या सिमेंटचे बॅरिगेट तोडून पाण्याला वाट करून देण्यात आली आहे.
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबी व पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी वाहतूक विभागाकडून सुचविलेल्या उपायांवर पीएमआरडीएकडून गेल्या आठ दिवसांसापासून अविरतपणे काम चालू आहे. अनेक ठिकाणी नवीन पाइपलाइन व चेंबर बसवून विविध उपाय करण्यात आल्याने आता पावसाळ्यात वाहतूक पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागणार नाही, अशी आशा आहे.
- प्रसाद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग
भविष्यातील नैसर्गिक संकटे व लोकसंख्या वाढीचा, डेव्हलपमेंटचा विचार करून सर्वच शासकीय संस्थांनी सुनियोजित विकास साधणे गरजेचे आहे. प्रगल्भ इच्छाशक्ती बाळगून अधिकाऱ्यांनी योगदान दिल्यास सर्व प्रश्न सुटतील पण अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती आणि कार्यरत शासकीय संस्थात समन्वयाचा अभाव असल्याने ‘आयटी’वर ही परिस्थिती ओढवली आहे.
- अर्चना आढाव, सरपंच, माण
पीएमआरडीए प्रशासनाकडून सध्या आयटी पार्क फेज तीन आणि दोनमध्ये कामे सुरू आहेत. हिंजवडी परिसरातील रस्ते वाहतुकी संदर्भातील प्रश्न व रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. ‘एमआयडीसी’च्या माण-हिंजवडी रस्त्याची स्वच्छता होणे गरजेचे आहे. वाहतुकीस अडचण ठरणारे आठवडे बाजार, एमआयडीसी परिसरातील टपऱ्या व पथारी व्यावसायिक अतिक्रमणे, पथदिवे, लक्ष्मी चौकातील खड्डे याबाबत ठोस उपाय करावेत.
- गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी