
मुंबई (Mumbai) : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श वसतीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये दिली. (Sanjay Shirsat, Ambadas Danve, Vidhanbhavan News)
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिरसाट बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सचिन आहिर, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, जगन्नाथ अभ्यंकर, संजय खोडके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा दर्जा सुधारण्यात येत असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, याठिकाणी असलेल्या स्वयंपाकगृहांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
वसतीगृहांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. त्यानुसार दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वसतीगृहात वेळेवर प्रवेश मिळावा यासाठीही नियमावली तयार करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वसतीगृहासाठी पहिल्या टप्प्यात 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच दुसरा हप्ताही देण्यात येणार आहे. राज्यातील वसतीगृहांमध्ये 1 कोटी 25 लाख विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वसतीगृह इमारत ही 10 कोटी रुपयांची असावी असे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश आहे त्या महाविद्यालयाच्या जवळच त्यांना वसतीगृहात प्रवेश मिळेल असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिली.