
पुणे (Pune) : मी दररोज हडपसर ते कात्रज प्रवास करतो. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीचा प्रवास नकोसा झाला आहे. बसमधील सहप्रवासी विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर तरुण मोठ्याने बोलून वाद घालतात.
कधी जागेवरून भांडण तर कधी धक्का लागला म्हणून भांडण. अनेकदा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणीही लावली जातात. याचा त्रास अन्य प्रवाशांनाही होतो. वाहकांनी हस्तक्षेप केला तर त्यांनाही जुमानत नाही. त्यामुळे पीएमपी बसमधील गोंगाटाने जीव मेटाकुटीला आला असल्याचे राजेश शेलार यांनी सांगितले.
हडपसरमधील रहिवासी राजेश शेलार याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण. मात्र अनेक प्रवाशांच्या वाट्याला हेच अनुभव येत आहेत. गेल्या काही दिवसांत पीएमपीत वाढत चाललेल्या काही तरुणांच्या असभ्य वर्तनाने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.
अशा प्रवाशांवर कोणाचेही अंकुश नसल्याने दिवसेंदिवस पीएमपीचा प्रवास जणू शिक्षाच वाटत असल्याची भावना शेलार यांनी व्यक्त केली.
हे ठरत आहे त्रासदायक
१) बसमध्ये महाविद्यालयीन व काही तरुण प्रवाशांच्या गोंधळात वाढ
२) एकमेकांना शिवीगाळ करणे, असभ्य भाषेत संवाद साधणे
३) सहप्रवाशांसोबत वाद घालणे
४) वाहकाने हस्तक्षेप केल्यास त्यांच्याशी उद्धट वर्तणूक
५) मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावणे
पीएमपी बसमधील वाढत्या गोंधळामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीएमपी प्रशासनाने असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे.
- अभिजित जोशी, प्रवासी
या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. दक्षता पथक व तपासणी पथकाच्या माध्यमातून पीएमपी प्रशासन बसची पाहणी करीत असते. असे काही घडत असल्यास या पथकांना कारवाईबाबत सूचना देण्यात येईल.
- किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल, पुणे