
नागपूर (Nagpur) : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. (Devendra Fadnavis News)
विदर्भातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी वैनगंगा-पैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प येत्या सात वर्षांत मार्गी लावणार आहे. 88 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे १० लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे ५५० किलो मीटर लांबीची नवी नदीच तयार होणार असून, यामुळे विदर्भात मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस विधानसभेत बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा-भंडारा-नागपूर या प्राधान्य क्रमाने खनिकर्म (मायनिंग) प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये गडचिरोलीत 50 हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक झाली असून, खनिजावर आधारित प्रकल्पामुळे गडचिरोली स्टील प्रकल्प म्हणून उदयाला येत आहे.
चंद्रपूर येथे कोल गॅसिफिकेशन प्लँट करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रकल्पाचा सामंजस्य करार होऊन केंद्राची मान्यता देखील मिळाली आहे. रामटेक, भंडारा येथील फेरो अलाय क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहाय्याने नागपूर मेट्रो प्रकल्प-2 पूर्ण करण्यात येणार आहे. कापूस ते कापड आणि कापड ते फॅशन संकल्पना अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये पूर्ण केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, राज्यात उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योजकांचा कल राज्याकडे वाढला असून, पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर व जालना ही दोन मोठी औद्योगिक क्षेत्र म्हणून पुढे येत असल्याने मराठवाडा औद्योगिक विकासाचे मोठे दालन होत आहे. वंदे भारत ट्रेन लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होत असल्याने या ठिकाणी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
टोयोटा प्रकल्प ऑरिक सिटीमध्ये आल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी ऑटोमोबाईल ईको सिस्टीम व्हावी म्हणून कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. शिरूर ते छत्रपती संभाजी नगर हा 14 हजार 886 कोटींचा ग्रीन फिल्ड मार्ग तयार करण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करता यावा यासाठी मदर डेअरीची मदत घेऊन दुग्धव्यवसायाला चालना देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई गोवा या महामार्गाच्या कामातील अडचणी दूर करण्यात करण्यात आल्या आहेत. युद्धपातळीवर या प्रकल्पाचे काम सुरू असून, हा महामार्ग पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिका विकास आराखडा संदर्भात सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. या सूचना हरकतींवर सुनावणी घेऊन योग्य निर्णय घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविणार आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले की, मागील अडीच वर्षात हाती घेतलेली कामे प्राधान्याने पूर्णत्वाला नेण्यात येणार आहेत.